नवनीत राणांचा लोकसभेत खंडणी प्रकरणी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप


नवी दिल्ली – महाराष्ट्रात माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या पत्रामुळे खळबळ माजली असताना त्याचे पडसाद लोकसभेतही उमटले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

परमबीर सिंह यांनी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ सापडलेल्या स्फोटकांच्या प्रकरणात अटक करण्यात आलेले निलंबित सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना दरमहा १०० कोटींची हप्तेवसुली करण्यास गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितल्याचा आरोप केला आहे. दरम्यान याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी निशाणा साधत गंभीर आरोप केला आहे. नवनीत राणा यांनी खंडणी प्रकरणात मुख्यमंत्र्यांचाही हात असल्याचा आरोप केला आहे.

महाराष्ट्रात माझे सहकारी खंडणी वसुली करण्याचे काम सुरु असल्याचे सांगत आहेत. मी त्यावरुन सांगू इच्छिते की, जो व्यक्ती १६ वर्ष निलंबित होता, सात दिवस जेलमध्ये राहिला त्याला कोणत्या आधारे पुन्हा सेवेत घेतले. भाजपचे सरकार जेव्हा होते तेव्हा सचिन वाझेंना पुन्हा सेवेत घेण्यास उद्धव ठाकरेंनी सांगितले होते. यासाठी फडणवीसांनी स्पष्ट नकार दिला होता. ठाकरे सरकार ज्यादिवशी महाराष्ट्रात आले, तेव्हा परमबीर सिंह यांना फोन करुन सर्वात आधी सचिन वाझेंना सेवेत घेतले. परमबीर सिंह यांची सचिन वाझेंमुळे बदली करण्यात आल्याचे नवनीत राणा यांनी सांगितले.

अशापद्दतीने जर खंडणी वसुल करण्याचे काम सुरु झाले तर संपूर्ण देशात असे होऊ शकते. माझी विनंती आहे की, इतरांवर ज्याप्रकारे आरोप लागले आहेत, मला सांगायचे आहे की महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरुनच हे सगळे सुरु आहे. बदल्या करणे, खंडणी वसुल करणे यामध्ये इतर कोणीही सहभागी नाही. एकट्या मुंबईतून महिन्याला १०० कोटी वसुली होत असेल तर संपूर्ण महाराष्ट्रातून किती होत असेल?, अशी विचारणा नवनीत राणा यांनी यावेळी केली.

दरम्यान शिवसेना आणि भाजप खासदारांमध्ये परमबीर सिंह यांच्या पत्रावरुन लोकसभेत जोरदार खडाजंगी पहायला मिळाली. लोकसभेत भाजप खासदार गिरीश बापट यांनी महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी केली. तर दुसरीकडे शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी त्यांना प्रत्युत्तर देत आरोप फेटाळून लावले.