आजपासून मुंबईतील बस, रेल्वे स्थानक, मॉल्समध्ये अँटिजन टेस्ट


मुंबई: महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत चालला असून महाराष्ट्रात मागील चोवीस तासांत 30 हजार 535 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. काल दिवसभरात या वर्षातील सर्वात जास्त रुग्ण सापडले आहेत. आजपासून मुंबईतील बस, रेल्वे स्थानक आणि मॉल्समध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी अँटिजन टेस्ट करण्यात येणार आहे.

आतापर्यंत महाराष्ट्रात 24 लाख 79 हजार 682 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून तीन दिवसांपूर्वी 25,833 सगळ्यात जास्त कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती. यापूर्वी स्पटेंबर 2020 मध्ये 24,896 नव्या रुग्णांची नोंद झाली होती. तर 99 रुग्णांच्या मृत्यूनंतर मृतांची संख्या 53 हजार 399 झाली होती. 11 हजार 314 रुग्ण कोरोनाने बरे होऊन घरी गेले आहेत. 22 लाख 14 हजार 867 कोरोनाबाधित रुग्ण आतापर्यंत बरे झालेले आहेत. मुंबईत तीन हजार 799 कोरोनाबाधित नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर 10 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

मागील चोवीस तासांत देशात 43 हजार 846 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. ही या वर्षातील सर्वाधिक रुग्णांची संख्या आहे. देशातील नव्या रुग्णांपैकी 83.14 टक्के रुग्ण महाराष्ट्र, केरळ, पंजाब, कर्नाटक, गुजरातमधील आहेत. महाराष्ट्र, तमिळनाडू, पंजाब, मध्यप्रदेश, दिल्ली, कर्नाटक, गुजरात, हरियाणात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. दिल्लीत शनिवारी पहिल्यांदाच 800 पेक्षा अधिक कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.

तज्ज्ञांच्या मते, लोकांना वाटत आहे की कोरोना संपुष्टात आलेला आहे. त्यामुळे ते कोरोना नियमांचे पालन करताना दिसून येत नाहीत. एम्सचे संचालक रणदीप गुलेरियांच्या मते, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची अनेक कारणे आहेत. पण मुख्य कारण म्हणजे, लोकांना वाटत आहे कोरोना संपलेला आहे. लोकांनी आणखी काही दिवस नियमांचे पालन करायला हवे.