‘टार्गेट 100 कोटी’वरुन अमृता फडणवीसांचा ठाकरे सरकारवर निशाणा


मुंबई – सध्या राज्यात सचिन वाझे प्रकरण गाजत असतानाच गृहमंत्र्यांवर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी पत्राद्वारे केलेल्या आरोपामुळे एकच खळबळ माजली आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबतच, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आणि राज्यपालांचे प्रिन्सिपल सेक्रेटरी यांना परमबीर सिंह यांनी एक पत्र पाठवले आहे. त्यांनी या पत्रातून गृहमंत्री देशमुख यांच्यावर अनेक आरोप केले आहेत.

विरोधकांनी या आरोपानंतर सरकारला आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांना धारेवर धरले आहे. आता अमृता फडणवीस यांनी या प्रकरणात उडी घेत सरकारवर निशाणा साधला आहे. एक ट्विट करत सरकारचा आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांचा अमृता फडणवीस यांनी समाचार घेतला आहे.


नाव न घेता अमृता फणवीस यांनी एक ट्विट केले आहे. “बात निकली है तो बहुत दूर तलक जाएगी, बादशाह को बचाने में कितनो की जान जाएगी ?” असे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी यात कुणाच्या नावाचा उल्लेख नसला तरी हॅशटॅगमध्ये ‘सचिन वाझे’ आणि ‘टार्गेट 100 कोटी’ असे म्हटले आहे. यावरून त्यांचा रोख सरकारवर असल्याचे लक्षात येते. याआधी देखील अमृता फडणवीस यांनी सचिन वाझे प्रकरणात एक ट्विट केले होते. कोण कोणास म्हणाले -*व्यवहार माझे,**जबाबदार वाझे!*सांगा पाहू ….” असे ट्विट त्यांनी वाझे प्रकरणी करत सरकारवर निधाणा साधला होता.