राज्यातील लॉकडाऊनबाबत उद्धव ठाकरेंनी मांडले मत


नंदुरबार – राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्यामुळे ठाकरे सरकारच्या चिंतेत भर पडू लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून गुरुवारी आतापर्यंतची एका दिवसातील सर्वाधिक कोरोनाबाधितांची नोंद झाली. २४ तासांत तब्बल २५ हजार ८३३ लोकांना कोरोनाची लागण झाली असून ५८ जणांचा मृत्यू झाला. यामुळे राज्याला पुन्हा एकदा लॉकडाउनचा मार्ग स्वीकारावा लागतो का काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावर नंदुबारमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना भाष्य केले आहे.

कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढला असून जो सर्वोच्च बिंदू सप्टेंबरमध्ये गाठला होता, आपण त्याच्या जवळपास किंवा पुढे आहोत. यावर पुन्हा एकदा लॉकडाउन करणे एक मार्ग असून लॉकडाउनचा पर्याय आपल्याला समोर दिसत आहे. पण अजूनही लोकांकडून मला सहकार्याची अपेक्षा आहे. लोक आता मास्क वापरु लागले असल्याचे उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले. पुढे ते म्हणाले की, परदेशी स्ट्रेन आपल्याकडे आला आहे, त्याचे आकडेही नियंत्रणात आले होते. पण आता जो पसरतो, तो नवा विषाणू आहे का याबाबत माहिती अद्याप तरी दिलेली नाही.