संपूर्ण देशाला नागपुरात जन्मलेली संघटना नियंत्रित करू पाहत आहे – राहुल गांधी


नवी दिल्ली – संपूर्ण देशाला नागपूरमध्ये जन्म झालेली एक संघटना नियंत्रण प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत, असल्याचे म्हणत काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. सध्या आसामच्या आगामी विधानसभा निवडणुकांसाठी राहुल गांधी प्रचारसभा घेत असून त्यांनी दिब्रुगढमध्ये झालेल्या एका प्रचारसभेत भाजपप्रणीत केंद्र सरकारसोबतच संघावर देखील निशाणा साधला आहे. देशात लोकशाहीचे पतन होत असून तरुण बेरोजगार आहेत. शेतकरी आंदोलन करत आहेत. सीएए सुद्धा आहे. दिल्लीत आसामची जनता आल्यानंतर त्यांनी त्यांची संस्कृती, भाषा बदलावी, अशी आपण अपेक्षा ठेऊ शकत नसल्याचे म्हणत राहुल गांधींनी सीएए कायद्यावरून केंद्र सरकारवर देखील निशाणा साधला.

काँग्रेसने आसाममध्ये होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकांसाठी जोरदार मोर्चेबांधणी केली असून आसाममध्ये सध्या स्टार प्रचारक राहुल गांधी प्रचारसभा घेत आहेत. आसाममध्ये २७ मार्च रोजी पहिल्या टप्प्यासाठी मतदान होणार असून दुसऱ्या टप्प्यासाठी १ एप्रिल तर तिसऱ्या टप्प्यासाठी ६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तर २ मे रोजी निवडणुकांचा निकाल लागणार आहे. भाजप आणि आसाम गण परिषद यांच्याविरुद्ध काँग्रेस आणि एआययूडीएफ असा हा थेट सामना होणार आहे. २००१मध्ये सत्तेत आल्यापासून पहिल्यांदाच २०१६मध्ये काँग्रेस पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर सत्तेत आलेल्या भाजपने सरबानंद सोनोवाल यांना मुख्यमंत्रीपदी बसवले.

दरम्यान, यावेळी राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधताना आसामच्या जनतेला ५ आश्वासने दिली आहेत. आसामच्या चहाच्या मळ्यातील मजुरांना ३५१ रुपये रोज देण्याचे आश्वासन भाजपने दिले होते. पण प्रत्यक्षात १६७ रुपयेच दिले जातात. पण मी नरेंद्र मोदी नाही, मी फसवणार नाही. मी तुम्हाला आज ५ गोष्टींची खात्री देतो. चहाच्या मळ्यातील मजुरांसाठी ३६५ रुपयांचा दर, सीएएला विरोध, राज्यात ५ लाख रोजगाराच्या संधी, २०० युनिटपर्यंत मोफत वीज आणि प्रत्येक गृहिणीसाठी २००० रुपये, अशी आश्वासने राहुल गांधी यांनी यावेळी दिली आहेत.