संध्याकाळी 6 नंतर कोल्हापूरच्या महालक्ष्मी अंबाबाई मंदिरामध्ये भाविकांना दर्शन नाही


कोल्हापूर – आजपासून (19 मार्च) महाराष्ट्रामध्ये साडेतीन शक्तीपीठांपैकी एक समजली जाणार्‍या कोल्हापूरच्या करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाईच्या मंदिराची वेळ बदलण्यात आली आहे. दरम्यान आता अंबाबाईच्या मंदिरात भाविकांना संध्याकाळी सहाच्या नंतर प्रवेश मिळणार नाही. दरम्यान महाराष्ट्रात वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना रूग्णांच्या संख्येत राज्यात पुन्हा झपाट्याने वाढ होताना पहायला मिळत आहे.

सकाळी 7 ते रात्री 9 या वेळेमध्ये कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे मंदिर हे पूर्वी भाविकांसाठी उघडण्यात येत होते. पण आता मुंबई, पुणे शहरातून अंबाबाईच्या मंदिरात येणारी गर्दी पाहता आणि वाढता कोरोनाचा धोका लक्षात घेता संध्याकाळी 6 च्या नंतर महालक्ष्मी मंदिराची दारे भाविकांसाठी बंद राहणार आहेत. मंगळवार, शुक्रवार आणि सुट्टीच्या दिवशी देवीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी होते. पण ही गर्दी आता नियंत्रणात ठेवली जाणार आहे. भाविकांच्या शरीराचे तापमान मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी मोजले जाणार आहे. हात सॅनिटाईज केले जाणार आहेत, तसेच भाविकांच्या तोंडावर मास्क असेल तरच त्यांना प्रवेश दिला जाणार आहे.

मागील वर्षभरापासून राज्यावर कोरोनाचे संकट घोंघावत आहे. मध्यंतरी दिवाळीच्या दिवसांत कोरोना स्थिती नियंत्रणात आल्यानंतर पाडव्यापासून राज्यभरातील प्रार्थनास्थळे खुली करण्याला सरकारने हिरवा कंदील दिला होता. पण आता पुन्हा कोरोना झपाट्याने पसरत असल्याने पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने दर्शन वेळेत कपात केली आहे.