कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच ठाकरे सरकारने जाहीर केली नवीन नियमावली


मुंबई – काल (गुरुवारी) महाराष्ट्राच्या चिंतेत मोठी भर पडली असून काल (१९ मार्च) सायंकाळी आलेल्या आकडेवारीने कोरोना संकट गडद झाल्याची जाणीव सरकारला आणि जनतेला करून दिली. राज्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून पहिल्यांदाच बाधितांची आतापर्यंतची उच्चांकी नोंद झाली. त्यामुळे आरोग्य विभाग आणि राज्य सरकारची झोप उडाली असून, कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी नवीन निर्बंध लागू करण्यात आले आहे. यासंदर्भातील नियमावली आज राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आली.

राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन कोरोनाच्या नव्या मार्गदर्शक सूचना राज्य सरकारने जारी केल्या आहे. यानुसार राज्यातील सर्व खासगी कार्यालय आणि आस्थापनांमध्ये ५० टक्के कर्मचारी ठेवण्याची सूचना करण्यात आली आहे. तसेच धार्मिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक मेळावे आणि सभा अशा इतर कारणांसाठी गर्दी करता येणार नाही, असे सरकारने स्पष्ट केले आहे.

मिशन बिगीन अगेन अंतर्गत राज्यातील सर्व खासगी कार्यालये व आस्थापनांमध्ये (आरोग्य व इतर अत्यावश्यक सेवा व आस्थापना तसेच मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्र वगळून) ५० टक्के कर्मचारी उपस्थिती ठेवण्याबाबत आदेश काढण्यात आले आहेत. सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांच्या विभाग व कार्यालय प्रमुखांनी कोरोना परिस्थिती लक्षात घेऊन त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती किती ठेवायची ते निश्चित करावे, असेही या आदेशात म्हटले आहे.

नाट्यगृह, सभागृहांमधील उपस्थिती देखील ५० टक्के करण्यात आली आहे. धार्मिक, सामाजिक, राजकीय , सांस्कृतिक मेळावे व सभा अशा इतर कारणांसाठी सभागृहांचा उपयोग करता येणार नाही, असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे. चेहऱ्यावर मास्क व्यवस्थित लावलेला नसेल, तर प्रवेश देण्यात येऊ नये. कोरोना नियमाचे लोकांकडून पालन करवून घेण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ असेल, याची खातरजमा करून घ्यावी, असेही या आदेशात म्हटले आहे.