येत्या वर्षभरात हटवण्यात येतील सर्व टोलनाके; नितीन गडकरींची मोठी घोषणा


नवी दिल्ली : लोकसभेत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मोठी घोषणा केली असून सर्व टोलनाके येत्या वर्षभरात हटवण्यात येतील. तसेच टोलच्या जागी GPS यंत्रणा बसवण्यात येईल, असे नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. सरकार सध्या सर्व टोलनाके रद्द करण्याच्या योजनेवर काम करत असल्याची माहिती त्यांनी दिली. जेवढा रस्तेप्रवास लोक करतील, तेवढाच टोल त्यांना द्यावा लागेल, अशा पद्धतीचे तंत्रज्ञान विकसित करण्याचे काम सुरु असल्याचे गडकरींनी नमूद केले.

लोकसभेत उत्तर प्रदेशातील अमरोहा मतदारसंघातील बसपा खासदार कुंवर दानिश अली यांनी महापालिकेच्या टोलचा मुद्दा उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना गडकरींनी ही माहिती दिली. मागील सरकारकडे बोट दाखवत, टोलनाक्यांद्वारे मलई खाण्यासाठी असे छोटे छोटे टोल उभारण्यात आल्याचे गडकरींनी म्हटले. शहरांच्या सीमांवर असे टोल असणे चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले.

गडकरीनी GPS प्रणालीबद्दल माहिती देताना सांगितले की, रशियन सरकारच्या मदतीने 2 वर्षांत संपूर्ण देश टोलनाका मुक्त होणार असून ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम जीपीएसला अंतिम स्वरूप देण्यात येत आहे. जीपीएस प्रणालीमुळे टोल थेट बँक खात्यातून वजा होणार आहे. वाहनांच्या हालचालीच्या आधारे टोल वसूल करण्यात येईल. तंत्रज्ञानामुळे पारदर्शक व्यवहार, कॅशलेस व्यवहारांना प्राधान्य देण्यात येईल.

तसेच ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम सुमारे 30 उपग्रहांचे नेटवर्क असून हे उपग्रह 20,000 किमी उंचीवर पृथ्वीभोवती फिरतात. तुम्ही कुठे आणि कोणत्या वाहनासोबत आहात याची अचूक माहिती या उपग्रहाच्या माध्यमातून मिळते. जीपीएस रिसीव्हरकडून सिग्नल रिसिव्ह करुन प्रक्रियेला सुरुवात केली जाते. ऑटोमॅटिक घड्याळ्यांच्या माध्यमातून सॅटेलाईटमार्फत माहिती मिळणार आहे. जीपीएस प्रणालीच्या आधारे वाहनाच्या हालचालीवरून टोल आकारण्यात येणार आहे. कार, नौका, विमान, सेल्युलर फोनमध्ये सिस्टम वापरण शक्य होणार आहे.

ही जीपीएस प्रणाली लागू केल्यानंतर टोलचे पैसे थेट बँक खात्यातून वळते होणार असल्याची माहिती नितीन गडकरी यांनी दिली आहे. सरकार जुन्या वाहनांमध्ये जीपीएस प्रणाली बसवण्याची योजना आखत असून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) च्या टोल उत्पन्नात 5 वर्षात प्रचंड वाढ होईल, असे देखील गडकरी यांनी सांगितले आहे.