संजय राठोड आणि मनसुख हिरेन प्रकरणी आशिष शेलारांचे गंभीर आरोप


मुंबई : दिवसेंदिवस राज्यातील महाविकास आघाडी सरकार अडचणीत येत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. आधी संजय राठोड प्रकरण आणि आता मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यू.प्रकरणावरुन भाजप नेते आशिष शेलार यांनी गंभीर आरोप केले आहेत. सांताक्रुज येथील फॉरेन्सिक लॅबला संजय राठोड प्रकरणातील ज्या ऑडिओ क्लिप पाठवण्यात आल्या आहेत. त्यामध्ये छेडछाड करण्यात येते की काय? तसेच मनसुख हिरेन यांच्या शवविच्छेदन अहवालात ही छेडछाड केली जाण्याची शक्यता लक्षात घेऊन या पुराव्यांची तातडीने स्वतंत्र यंत्रणेमार्फत तपासणी करा, अशी मागणी शेलार यांनी आज केली आहे.

शेलार पुढे म्हणाले की, या ठाकरे सरकारच्या काळात रोज नवीन हेराफेरी सुरू आहे. एका गुन्ह्याला लपवण्यासाठी दुसरा गुन्हा केला जात आहे. एका तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेण्यात आला. त्यानंतर सचिन वाझे प्रकरण उघड झाले. त्याचा फायदा घेत राठोड प्रकरणातील ऑडिओ क्लीप ज्या सांताक्रूझ येथील फाँरेन्सीक लॅबमध्ये पाठवण्यात आल्या आहेत. त्यामध्ये छेडछाड सुरु आहे की काय? तो आवाज संजय राठोड यांचा नाहीच, असा अहवाल तयार होण्यासाठी पोलीस यंत्रणेमार्फत छेडछाड होण्याची शक्यता असल्याचा गंभीर आरोप शेलार यांनी केला आहे.

तसेच पोलिसांना मनसुख हिरेन यांचा शवविच्छेदन अहवाल तसे शवविच्छेदन करतानाचे रेकॉर्डिंग पुर्णपणे देण्यात आलेले नाही. त्यामध्ये सुध्दा छेडछाड केली जाते आहे की काय? अशी शंका शेलार यांनी उपस्थित केल्यामुळे या सगळ्या प्रकरणी स्वतंत्र यंत्रणेमार्फत या पुराव्यांची तपासणी होण्याची गरज असल्याचे आमदार आशिष शेलार यांनी म्हटले आहे.