मुंबई – मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली करण्यात आली असून राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांच्याकडे त्यांच्या जागी ही जबाबदारी देण्यात आली आहे. तर राज्याच्या पोलीस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार रजनीश शेठ यांच्याकडे देण्यात आला आहे. त्यामुळे आता राज्यातील जनतेला रजनीश शेठ कोण आहेत आणि त्यांची पोलीस कारकीर्दीतील कामगिरी कशी राहिली याची उत्सुकता लागून राहिली आहे. त्यामुळे आम्ही तुम्हाला त्यांची माहिती देत आहोत.
रजनीश शेठ यांचा जन्म 29 डिसेंबर 1963 रोजी झाला असून 1988 च्या बॅचचे रजनीश शेठ हे आयपीएस अधिकारी आहेत. पोलीस दलात त्यांची भरती 25 ऑगस्ट 1988 ला झाली. रजनीश शेठ यांचे शिक्षण बी.ए.ऑनर्स (एलएलबी) झाले असून आझाद मैदान दंगलीच्या वेळी रजनीश शेठ हे मुंबईचे कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे सहपोलीस आयुक्त होते. त्यानंतर रजनीश शेठ हे फोर्स वन महाराष्ट्राचे प्रमुख राहिलेले आहेत.
गृह विभागाचे प्रधान सचिव म्हणूनही शेठ यांनी जबाबदारी सांभाळलेली आहे. राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक म्हणूनही त्यांनी काम केलं आहे.आणी नुकतीच त्यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली होती.दरम्यान, शांत स्वभावाचे अधिकार म्हणून रजनीश शेठ यांची ओळख आहे. रजनीश शेठ आतापर्यंत कुठल्याच वादात सापडलेले नाहीत.