औरंगाबाद जिल्ह्यातील हॉटेल, ढाबे, रिसॉर्ट, परमीट रुम १७ मार्चपासून ४ एप्रिलपर्यंत पूर्णतः बंद


औरंगाबाद – कोरोनाचा प्रादुर्भाव राज्यात झपाट्याने वाढत असून राज्यातील मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद आदी प्रमुख शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर कोरोनाबाधित आढळून येत असल्यामुळे स्थानिक प्रशासनाकडून निर्बंध अधिकच कडक केले जात आहे. त्यातच आता औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांनी आज या पार्श्वभूमीवर आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे.

१७ मार्च सायंकाळी ६ पासून ते ४ एप्रिलपर्यंत औरंगाबाद जिल्ह्यातील रेस्टॉरंट, हॉटेल, परमीट रूम, नाश्ता सेंटर, धाबे, फूड पार्क, फन पार्क, रिसॉर्ट मधील डायनींग सुविधा (आसनावर बसून खाने) पूर्णतः बंद करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशात असे म्हटले आहे की, जिल्ह्यात व शहर ग्रामीण भागात अंशत: लॉकडाउनबाबत पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त व जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तपासणी दौरा केला होता. या दरम्यान डायनिंग व रेस्टॉरंट, हॉटेल, परमीट रूम, नाष्टा सेंटर, ढाबे आदी ठिकाणी मोठी गर्दी होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले आहे.

ही बाब कोविड-19 प्रतिबंधक कार्यवाहीस बाधा निर्माण करत असल्यामुळे उपाययोजना म्हणून डायनिंग व रेस्टॉरंट, हॉटेल, परमीट रूम, नाष्टा सेंटर, ढाबे, फूड पार्क, रिसॉर्टमधील डायनिंग सुविधा आसनावर (बसून खाणे) पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केवळ पार्सल सुविधा, टेक अवे किंवा घरपोच सुविधा सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. जेणेकरून गर्दीस प्रतिबंध करता येणार आहे.

बुधवार १७ मार्च सकाळी ६ वाजेपासून ते ४ एप्रिल २०२१ पर्यंत हा आदेश लागू असणार आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

तसेच ४ एप्रिलपर्यंत वेरुळ, अजिंठ्यासह औरंगाबाद जिल्ह्यातील पर्यटनस्थळे बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण आणि महापालिका आयुक्त अस्तिककुमार पांडेय यांनी संयुक्तपणे दिले आहेत.

तसेच अंत्यविधीच्या कार्यक्रमासाठी २० पेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येऊ नये असे नव्याने घातलेल्या निर्बंधात म्हटले आहे. गुरुवारपासून औरंगाबाद शहरात अशंत: टाळेबंदी लागू करण्यात आली असून रात्री ९ वाजल्यापासून सर्व दुकाने बंद करण्याचे निर्देश तीन दिवसापूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. त्या आदेशात दुरुस्ती करुन पर्यटनस्थळे, किल्ले, स्मारके, संग्रहालये बंद करण्याच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

दुकाने सुरू ठेवण्यासाठी चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. तर, यापूर्वीच शहरातील विवाहसमारंभ, सभा, आंदोलने, शाळा, महाविद्याालये, विद्यापीठातील अध्ययन-अध्यापन बंद करण्यात आले आहे.