मुंबई : गुन्हे शाखेतून मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात संशयाच्या भोवऱ्यात अडकलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची बदली करण्यात आली असून आता एपीआय सचिन वाझेंकडून या प्रकरणात सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या या अर्जावर 19 मार्च रोजी सुनावणी होणार आहे. वाझे यांनी काल ठाण्यातील सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे.
दरम्यान या प्रकरणात चर्चेत असेलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची गुन्हे शाखेतून बदली करण्यात आली आहे. नागरी सुविधा केंद्रात वाझे यांची बदली करण्यात आली आहे. पोलीस मुख्यालयातून सचिन वाझे यांच्या बदलीसंदर्भातील आदेश काढण्यात आले. सचिन वाझे आतापर्यंत मुंबई गुन्हे शाखेत कार्यरत होते.
पोलीस अधिकारी सचिन वाझे मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात चांगलेच अडचणीत आले आहेत. मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर जी स्कॉर्पिओ गाडी सापडली होती, त्या स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू झाला. विरोधी पक्षांनी हिरेन यांच्या मृत्यूचा संशंय थेट सचिन वाझे यांच्यावर घेतला आहे आणि त्यावरुन राज्य सरकारवर टीका केली आहे. त्यावर आता राज्यातील राजकारण चांगलेच पेटले आहे.