मुनगंटीवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावरुन संजय राऊतांचा टोला


मुंबई – पुढील तीन महिन्यात राज्यात भाजपचे सरकार येईल, असा दावा भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यावरुन टोला लगावला असून सुधीर मुनगंटीवारांचे विनोदी कार्यक्रम राज्यभरात ठेवले तर लोकांची गर्दी होईल, असे म्हटले आहे. संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सरकार पुढील तीन वर्ष मजबुतीने काम करेल, असा विश्वास व्यक्त केला.

विरोधी पक्षाने अधिवेशनात उत्तम कामगिरी केली. खरे खोट काय ते नंबर बघू… पण ही विरोधी पक्षाची भूमिका पुढील साडे तीन वर्ष त्यांनी उत्तम प्रकारे पार पाडावी. पुढील तीन महिन्यात सरकार येईल, असे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. ते चांगला विनोद करतात… लवकरच महाराष्ट्रातील चित्रपटगृह सुरु होत आहेत. आत्ताच मला काही प्रमुख नाट्य निर्मात्यांचा फोन आला होता. त्यांना काही सूट हवी आहे. मला काही गरज वाटत नाही, सुधीरभाऊंचे असे विनोदी कार्यक्रम ठेवले तर लोक गर्दी करतील, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

पुढील तीन वर्ष महाविकास आघाडी सरकार पूर्णपणे मजबुतीने काम करेल. सुधीर मुनगंटीवार किंवा भाजपने त्याबाबत अजिबात चिंता करु नये. ते उत्तम विरोधी पक्षाची भूमिका निभावत असून त्यांनी त्यात कायम राहावे, असे संजय राऊत म्हणाले आहेत.

संजय राऊत पुढे म्हणाले की, कधी कधी खलनायकसुद्धा चित्रपट पुढे घेऊन जातो. नायकासोबत खलनायक सुद्धा ताकदीचा लागतो. जेव्हा आम्ही चित्रपट पाहायचो तेव्हा प्राण, शक्ती कपूर, अमरीश पुरी, निळू फूले, राजशेखर असे अनेक खलनायक होते. त्यांच्यावर सुद्ध चित्रपट चालत होते. महाविकास आघाडी असल्याने हा महासिनेमा आहे. यात देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार यांच्यासारखे कलाकार असतात. त्यांनी आपली भूमिका वठवली आहे. पुढील साडे तीन वर्ष या राज्यातील वातावरण खेळीमेळीचे आणि हसतमुख राहील.

सामनावर फडणवीसांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना ते म्हणाले की, सामना वाचतात हे त्यांनी कबुल केले. सामना वाचणे सुंदर सवय आहे. महाराष्ट्र, देशात सत्य काय घडत आहे त्याची माहिती सामनामधून मिळत असते. सामनाची दखल संपूर्ण जग घेत असल्यामुळे देवेंद्रजींना चांगली सवय लागली असेल तर मी त्यांचे कौतुक करतो.