अखेर १५ वर्षांनंतर झाली पाकिस्तानमधून आलेल्या गीताची आईशी भेट


मुंबई – जवळपास एका दशकाहून अधिक काळ पाकिस्तानात वास्तव्य केल्यानंतर २०१५ साली भारतात परतलेली मूकी व बहिरी असलेल्या गीताची अखेर तिच्या कुटुंबियांशी भेट झाली आहे. विशेष म्हणजे गीताचे कुटुंब हे महाराष्ट्रातील असून गीताची नुकतीच तिच्या खऱ्या आईशी भेट झाल्याची माहिती पाकिस्तानमध्ये तिची देखभाल करणाऱ्या सेवाभावी संस्थेने जाहीर केली आहे. गीताला भारतात तत्कालीन परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या प्रयत्नांमुळे पाठवण्यात आले होते.

याबाबत पाकिस्तानमधील डॉन या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार गीताची नुकतीच तिच्या खऱ्या आईशी भेट झाल्याचा खुलासा एधी फाउंडेशन या सेवाभावी संस्थेचे माजी प्रमुख दिवंगत अभ्दुल सत्तार एधी यांची पत्नी बिलकिस एधी यांनी केला आहे. महाराष्ट्रात गीता आणि तिच्या आईची भेट झाल्याचे सांगण्यात आले आहे. माझ्या संपर्कात गीता होती. माझी आणि आईची भेट झाल्याचे तिने याच आठवड्यात मला सांगितल्याचे बिलकिस यांनी म्हटले आहे.

त्याचप्रमाणे बिलकीस यांनी पीटीआयशी बोलताना, गीताचे खरे नाव राधा वाघमारे असून तिची आई महाराष्ट्रातील नायगाव येथील असल्याची माहिती दिली. बिलकीस यांनी दिलेल्या माहितीनुसार जेव्हा गीता त्यांच्याकडे आली होती, तेव्हा ती ११ ते १२ वर्षांची होती. तिचा सांभाळ एधी यांच्या सेवाभावी संस्थेनेच केला आणि तिचे मूळ पालक आणि शहर शोधण्यासाठी एक दशक प्रयत्न सुरु ठेवले. एक मुलगी लाहोर रेल्वे स्थानकात समझोता एक्स्प्रेसमध्ये एकटीच बसलेली असल्याचे पाकिस्तानच्या रेंजर्सना आढळले होते. त्यानंतर दहा वर्षांनी म्हणजेच २०१५ साली याच गीताला भारतात आणण्यात आले.

बिलकीस यांनी दिलेल्या माहितीनुसार, चूकून ट्रेनमध्ये बसून ही मुलगी पाकिस्तानात आली. त्यांची आणि या मुलीची पहिली भेट कराचीमध्ये झाली. या मुलीचे पालन पोषण करणारे तेव्हा कोणीच नव्हते. त्यांनी अखेर या मुलीची जबाबदारी घेत तिला लाहोरमधील आपल्या संस्थेच्या केंद्रात ठेवले. बिलकीस यांनी सुरुवातीला या मुलीचे नाव फातिमा ठेवले होते. पण ती हिंदू असल्याचे समजल्यानंतर तिचे नाव गीता ठेवण्यात आले. भारतात परतल्यानंतरही गीताला तिच्या आई-वडीलांचा शोध घेण्यासाठी साडेचार वर्षांहून अधिक कालावधी लागला. तिच्या खऱ्या पालकांची डीएनए चाचणीच्या मदतीने ओळख पटल्याचा दावा बिलकीस यांनी केला आहे. काही वर्षांपूर्वी गीताच्या खऱ्या वडीलांचा मृत्यू झाला असून गीताची आई मीना यांनी दुसरे लग्न केल्याचेही बिलकीस यांनी स्पष्ट केले आहे.

भारतात परतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही गीताची भेट घेऊन पाकिस्तानात तिचा सांभाळ करणाऱ्या एधी फाउंडेशनला एक कोटी रूपयांची मदत जाहीर केली होती. गीताची ही कहाणी सलमान खानच्या बजरंगी भाईजान या चित्रपटामुळे सर्वांसमोर आली होती. भारतीय उच्चायुक्त टी.सी.ए.राघवन व त्यांच्या पत्नीने परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या सांगण्यावरून गीताची भेट घेतली होती. या भेटीनंतरच गीताला परत आणण्याची सुत्रे वेगाने हलवली आणि ती भारतात परतली होती. कराची येथे विमानात बसण्यापूर्वी गीताने पाकिस्तानी लोकांचेही आभार मानले होते.