उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यानंतर लॉकडाऊनसंदर्भात मोठा निर्णय जाहीर होण्याची शक्यता


मुंबई – मागील काही दिवसांपासून राज्यामध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी याच पार्श्वभूमीवर राज्यातील जतनेला सावधानतेचा इशारा दिला आहे. उद्धव ठाकरे यांनी लॉकडाउनसोबतच कोरोनासंदर्भातील नियमांचे पालन जनतेने करावे, असे आवाहन केले आहे.

पण त्याचबरोबर परिस्थिती हाताबाहेर गेलेली नाही हे सांगताना जनतेने काय काळजी घ्यावी यासंदर्भातील इशाराही त्यांनी दिला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आपल्याला पहिल्यापासून सुरुवात करण्याची गरज लागू शकते, असेही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी साडेबाराच्या सुमारास मुंबईमधील जे. जे. रुग्णालयामध्ये कोरोना लसीचा पहिला डोस घेतला. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राज्यातील जनतेला लसीसंदर्भात मनात कोणताही संभ्रम न ठेवता लस टोचून घेण्याचे आवाहन केले. कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना उद्धव यांनी, मी राज्यातील जनतेला विनंती करतो की जे पात्र आहेत त्यांनी लसीकरण करुन घ्यावे आणि सार्वजनिक ठिकाणी नागरिकांनी अनावश्यक गर्दी टाळावी, असे म्हटले आहे.

तसेच पुढे बोलताना, सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर, सुरक्षित अंतर ठेवणे आणि हात धुणे हे नियम पाळावे लागतील. कदाचित पाहिल्यापासून आपल्याला सुरुवात करावी लागेल. परिस्थिती अजूनही हाताबाहेर गेलेली नाही. ती जाऊ नये असे वाटत असेल तर ही बंधने पाळणे अत्यावश्यक असल्याचेही उद्धव यांनी म्हटले आहे.

निर्बंध असतानाही औरंगाबादमधील लोक बाहेर फिरत असल्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला असता उद्धव ठाकरे यांनी, कडक लॉकडाउन काही ठिकाणी करावा लागेल. आम्ही यासंदर्भात येत्या एक दोन दिवसांत निर्णय घेणार आहोत. गरज वाटेल तिथे लॉकडाउन करावा लागेल, असे स्पष्ट केले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वेगवेगळ्या शहरांमधील निर्बंध कठोर करण्यात आले आहेत. काही ठिकाणी आठवडे बाजार बंद करण्यात आले आहेत तर काही ठिकाणी शनिवार रविवारी दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. मात्र लवकरच लॉकडाऊनसंदर्भात मोठा निर्णय जाहीर होईल अशी शक्यता उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यानंतर व्यक्त केली जात आहे.