हापूस आंब्याच्या 5 डझनच्या पेटीची 1 लाख 8 हजारांना विक्री


रत्नागिरी : कोकणचा हापूस आंबा सातासमुद्रापार प्रसिद्ध आहे. हजारो टन हापूस दरवर्षी परदेशी रवाना होतो. हापूसला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात देखील मोठी मागणी. पण, हापूसच्या पाच डझनच्या पेटीला 1 लाखाचा दर मिळाला असे जर तुम्हाला कुणी सांगितले तर कदाचित विश्वास बसणार नाही. पण, याच कोकणच्या या राजाला पाच डझनच्या पेटीला तब्बल 1 लाख 8 हजारांचा दर मिळाला आहे.

शुक्रवारी मुंबईच्या अंधेरीतील मॅरिएट हॉटेलमध्ये हापूसचा लिलाव पार पडला. त्यावेळी रत्नागिरी, देवगड, राजापूरातील 10 आंबा उत्पादक शेतकरी सहभागी झाले होते. यावेळी राजापुरातील बाबू अवसरे या शेतकऱ्याच्या 5 डझन हापूस आंब्याच्या पेटीला किमान शतकातील अर्थात 1 लाख 8 हजाराचा दरविक्रमी दर लिलाव पद्धतीने मिळाला आहे. उद्योजक आणि सेंट अग्नेलो व्हीएनसीटी व्हेंचरच्या राजेश अथायडे यांनी शेतकऱ्यांचा उत्साह, आत्मविश्वास वाढवणारी मायको ब्रँडची पहिली पेटी 1 लाख 8 हजार रुपये अशी विक्रमी किंमत देऊन घेतली. या लिलावातील सहभागी हापूस उत्पादकाला प्रत्येकी 31 हजार रूपये मिळाले.

दरम्यान, निसर्गाची वक्रदृष्टी सध्याच्या घडीला हापूसवर झाली असल्यामुळे आंबा उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात असून त्याचा उत्साह यामुळे नक्कीच वाढणार आहे. या साऱ्याकरिता चिपळूणमधील आमदार, सह्याद्री शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शेखर निकम, ग्लोबल कोकणचे प्रमुख संजय यादवराव, किशोर धारिया, माजी नगरसेवक आणि मुंबईतील हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष प्रकाश दरेकर, हापूस आंब्याचे एक्सपोर्टर दीपक परब यांनी पुढाकार घेतला होता.

शेतकरी देखील या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी 10 शेतकऱ्यांना प्रत्येकी 31 हजार रूपये लिलावाअंती देण्यात आले होते. कोकणातील शेतकऱ्याचा आत्मविश्वास दुणावला जावा. हापूसला आणखी चांगला दर मिळाला यासाठी हा लिलाव आयोजित करण्यात आला होता. देवगड तालुक्यातील सौंदळे गावामधील नाना गोखले, राजापूर तालुक्यातील पडवे, कुंभवडे, शिरसे, वाडा तिवरे, वेल्ये, रत्नागिरी या ठिकाणचे जवळपास दहा शेतकरी यावेळी सहभागी झाले होते.