गुन्हा रद्द करण्यासाठी शर्जिल उस्मानीची उच्च न्यायालयात धाव


मुंबई – अलिगढ विद्यापीठातील माजी विद्यार्थी नेता शर्जिल उस्मानी याच्यावर पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेत हिंदू धर्माबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो गुन्हा रद्द करावा, या मागणीसाठी आता शर्जिलने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तसेच याचिकेवरील सुनावणी प्रलंबित असेपर्यंत आपल्याविरोधात कोणतीही कारवाई करण्यापासून पोलिसांना मज्जाव करावा, अशी मागणीही त्यांनी आपल्या याचिकेत केली आहे.

30 जानेवारीला पुण्यात एल्गार परिषद पार पडली होती. शर्जिलने यावेळी भाषण करताना हिंदू धर्म, न्यायव्यवस्था आणि संसदेबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. प्रदीप गावडे यांनी याप्रकरणी तक्रार केल्यानंतर स्वारगेट पोलीस ठाण्यात 2 फेब्रुवारी रोजी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. शर्जिलने हा गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

आपल्या वक्तव्यानंतर कोणत्याही प्रकारची हिंसा झाली नाही किंवा सामाजिक सलोखा बिघडला नसल्यामुळे आपल्याविरोधात गुन्हा हा आधारहीन असल्याचा दावा त्याने याचिकेत केला आहे. आपण भाषणात कोणताही धर्म, जात किंवा समुदायाबाबत द्वेषभावना न ठेवता प्रत्येकाने समाजात निर्माण झालेल्या वाईट इच्छाशक्तीविरोधात लढण्याचे आवाहन केले होते, असेही शर्जिलने याचिकेत म्हटले आहे.