पुण्यातील निर्बंधाबाबत अजित पवार लवकरच घेणार निर्णय


पुणे : राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढत होत असून हे प्रमाण पुण्यातही लक्षणीय आहे. पुण्यातील कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येचे कारण शोधण्याचा आयसर आणि टाटा इन्स्टिट्यूट या संस्थांनी प्रयत्न केला आहे. शाळा आणि महाविद्यालये सुरू झाल्यामुळे येथे कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ झाल्याचे या संस्थांनी म्हटले आहे. तसे निष्कर्ष आयसर आणि टाटा इन्स्टिट्यूटने काढले आहेत. या निष्कर्षानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आता येत्या शुक्रवारी पुण्यातील निर्बंधांबाबत निर्णय घेणार आहेत.

कोरोनाबाधित वाढण्याचे कारण शोधण्यासाठी आयसर आणि टाटा इन्स्टिट्यूट या संस्थांनी सर्वेक्षण केले होते. यामध्ये शाळा आणि महाविद्यालये सुरु झाल्यामुळे पुण्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाल्याचे या संस्थांनी म्हटले. या संस्थांनी विभागीय आयुक्तांना तसा पाहणी अहवाल दिला. या अहवालाचे सादरीकरण विभागीय आयुक्तांसमोर करण्यात आल्यानंतर आता याच संस्थांना आणखी एक सूचना अहवाल तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामध्ये पुण्यात पुन्हा लॉकडाऊन लागू नये तसेच कोरोनाबाधितांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी काय प्रयत्न करायला पाहिजेत?, यावर सूचाना देण्याचे या संस्थांना सांगण्यात आले आहे.

दरम्यान पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे येथील प्रशासनाची धावपळ उडत आहे. शाळा आणि महाविद्यालये सुरु केल्यामुळे कोरोना रुग्ण वाढल्याचे समोर आल्यानंतर आता शाळांना पुन्हा एकदा ब्रेक लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली येत्या शुक्रवारी एक बैठक होणार आहे. या बैठकीत पुण्यातील निर्बंधाबवर निर्णय घेण्यात येणार आहे.