राज्यपालांनी मंजूर केला संजय राठोड यांचा राजीनामा


मुंबई – पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावे लागलेले संजय राठोड यांचा राजीनामा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मंजूर केला आहे. 28 फेब्रुवारीला संजय राठोड यांनी आपल्या पदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे दिला होता. मुख्यमंत्री कार्यालयाकडून राज्यपालांकडे राजीनामा पाठवण्यात आला. अखेर राज्यपालांनी राठोड यांचा राजीनामा मंजूर केला.

दरम्यान ठाकरे सरकारमधील मंत्री संजय राठोड यांनी रविवारी (28 फेब्रुवारी) पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी राजीनामा दिला होता. पण अद्याप राज्यपालांकडे संजय राठोड यांचा राजीनामा पाठवलाच नसल्याची माहिती समोर आली होती. संजय राठोड यांनी राजीनामा देऊन एवढे दिवस उलटले तरी अद्याप मुख्यमंत्र्यांकडेच आहे का? असा प्रश्न यामुळे उपस्थित होत होता.

संजय राठोड यांनी रविवारी राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रकारांनी आता पुढे काय अशी विचारणा केली होती. उद्धव ठाकरे यांनी त्यावेळी म्हटले होते की, राजीनामा फ्रेम करुन लावण्यासाठी घेतला नाही. त्यांचे म्हणणे असे होते की राजीनामा लवकरच राज्यपालांकडे पाठवला जाणार आहे. पण संजय राठोड यांचा राजीनामा राज्यपालांकडे पोहोचलेला नाही. याचा अर्थ असा की कायदेशीरदृष्ट्या संजय राठोड वनमंत्री पदावर कायम आहेत.

संजय राठोड यांनी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा देण्याआधी पूजा चव्हाण प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर राजीनाम्याचा स्वीकार करावा अशी विनंती केली होती. संजय राठोड आपले मंत्रिपद टिकावे म्हणून शेवटपर्यंत प्रयत्न करत होते. संजय राठोड यांचा राजीनामा घ्यावा यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर मोठा दबाव होता. या प्रकरणावरुन शिवसेना आणि महाविकास आघाडीवर टीकेची झोड उडवली जात होती.