चौथी कसोटी: इंग्लंडचा डाव २०५ धावांवर आटोपला, तर भारताची अडखळत सुरूवात


अहमदाबाद – तिसऱ्या कसोटी सामन्यातील निराशाजनक कामगिरीनंतर चौथ्या कसोटी सामन्यातही मैदानात उतरलेल्या इंग्लडच्या खेळाडूंनी सपशेप लोटांगण घेतले. इंग्लंडचा संघ अक्षर पटेल, मोहम्मद सिराज आणि आर. आश्विन यांच्या भेदक माऱ्यासमोर टिकाव धरू शकला नाही. २०५ धावांवरच इंग्लंडचा संपूर्ण संघ गारद झाला. बेन स्टोक्स वगळता एकाही खेळाडूला जम बसवता आला नाही. भारताकडून अक्षर पटेलने सर्वाधिक ४ गडी बाद केले. दरम्यान, भारताचाही सुरूवात निराशाजनक झाली. शून्य धावसंख्या असतानाच शुभमन गिल बाद झाला.

झटपट संपलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यामुळे चर्चेत असलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्याला सुरूवात झाली. नाणेफेक जिंकत इंग्लंडने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. झॅक क्रॉली आणि डॉमिनिक सिब्ले यांनी इंग्लंडच्या डावाची सुरूवात केली. पण, सलामी ही जोडी फार काळ मैदानात तग धरू शकली नाही. आपल्या पहिल्याच षटकात अक्षर पटेलने सिब्लेला त्रिफळाचित केले. सिबलेला पाठोपाठ अक्षरने दुसरा सलामीवीर झॅक क्रॉलीला टिपलं. झॅक केवळ ९ धावा करून परतला.

त्यानंतर इंग्लंडचा कर्णधार जो रुटही फार काळ मैदानात तग धरू शकला नाही. जो रुटचा अडथळा मोहम्मद सिराजने दूर केला. इंग्लंडचा पहिला डाव २०५ धावांवर आटोपला आहे. इंग्लंडकडून बेन स्टोक्सने सर्वाधिक ५५ धावा करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. तर डॅनियल लॉरेन्सने ४६ धावांची खेळी केली. भारतीय गोलंदाजांनी अचूक मारा करत इंग्लंडच्या फलंदाजांना फिरकीचा जलवा दाखवला. भारताकडून अक्षर पटेलने सर्वाधिक ४ गडी बाद केले. तर आर अश्विनने ३ बळी घेत साथ दिली. तसेच मोहम्मद सिराजनेही इंग्लंडच्या २ फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला.

इंग्लंडचा संपूर्ण संघ २०५ धावांवर बाद झाल्यानंतर भारताकडून सलामीवीर शुभमन गिल आणि रोहित शर्मा यांनी डावाची सुरूवात केली. पण, डाव्याच्या पहिल्याच षटकात जेम्स अंडरसनने शुभमनला बाद केले. भारताची धावसंख्या शून्य असतानाच गिल तंबूत परतल्यानंतर चेतेश्वर पुजारा आणि रोहित शर्माने सावध सुरूवात केली. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा भारताची धावसंख्या एक बाद २४ धावा होती. रोहित शर्मा १५ धावा, तर चेतेश्वर पुजारा ८ धावांवर खेळत आहे.