महाराष्ट्रात कोरोना लसीचा दुसरा डोस घेतलेल्या व्यक्तीचा मृत्यू; कारण अस्पष्ट


मुंबई – कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर भिवंडी शहरात मंगळवारी सकाळी चक्कर येऊन एका आरोग्य सेवकाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. पण, अद्याप त्याच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकलेले नसून हे कारण शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होऊ शकणार आहे..

ठाण्यातील मनोरमानगर परिसरामध्ये या घटनेत मृत्यू पावलेली ४० वर्षीय व्यक्ती राहात होती. ते भिवंडीतील एका खासगी डॉक्टरकडे वाहनचालक म्हणून काम करीत होते. मंगळवारी सकाळी ११ वाजता त्यांनी भिवंडी शहरातील भाग्यनगरमधील केंद्रात कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा दुसरा डोस घेतला होता. त्यानंतर ते लसीकरण केंद्रातील प्रतीक्षागृहात थांबले होते. पंधरा मिनिटांनी चक्कर येऊन ते खाली पडले.

भिवंडीतील स्व. इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात त्यांना उपचारांसाठी नेण्यात आले असता, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. भिवंडी महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के आर. खरात यांनी या वृत्तास दुजोरा दिला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी जे जे रुग्णालयात पाठवण्यात आला असून मृत्यूचे नेमके त्यानंतर कारण स्पष्ट होईल. दरम्यान कुटुंबियांनी मृत्यूची पूर्ण चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे.