नवी दिल्ली : देशात कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यास सुरुवात झाली असून ६० वर्ष पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना या टप्प्यात लस दिली जाणार आहे. त्याचबरोबर ४५ वर्षांवरील पण गंभीर आजार असणाऱ्या लोकांचंही या टप्प्यात लस दिली जाणार आहे. आता सरकारी रुग्णालयांसोबतच काही खाजगी रुग्णालयांमध्येही लसीकरणाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
दरम्यान, केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी देशातील कोरोना लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी मोठा निर्णय जाहीर केला आहे. देशभरातील नागरिक आता 24×7 कधीही आपल्या सोईनुसार कोरोना लस घेऊ शकणार आहेत. यासंदर्भात केलेल्या ट्विटमध्ये केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन म्हणाले की, कोरोना लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी केंद्र सरकारने लसीकरणासाठी असलेली वेळमर्यादा समाप्त करण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील नागरिक आता 24×7 कधीही लस घेऊ शकतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील नागरिकांच्या आरोग्यासोबतच त्यांच्या वेळेचे महत्त्वही जाणतात.
सरकार ने #vaccination की रफ़्तार बढ़ाने के लिए समय की बाध्यता समाप्त कर दी है। देश के नागरिक अब 24×7अपनी सुविधानुसार टीका लगवा सकते हैं।
PM श्री @narendramodi जी देश के नागरिकों के स्वास्थ्य के साथ-साथ उनके समय की कीमत बखूबी समझते हैं।#VaccineAppropriateBehavior pic.twitter.com/cpKVlXurvL
— Dr Harsh Vardhan (@drharshvardhan) March 3, 2021
कोरोना लसीकरणाला सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत देशभरातील 1.54 कोटी नागरिकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. मंगळवारी देण्यात आलेल्या या आकडेवारीमध्ये सहा लाख ९ हजार ८४५ लसींचाही समावेश आहे. ही माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आपल्या तात्पुरत्या आकडेवारीमध्ये दिली आहे. कोरोना विरोधात देशव्यापी लसीकरण मोहीम १६ जानेवारीपासून सुरू झाली होती. सुरुवातीला आरोग्य कर्मचाऱ्यांना आणि २ फेब्रुवारीपासून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लसीकरणाची सुरुवात झाली होती.