सर्वोच्च न्यायालयाकडून १३ महिन्यांच्या तुरुंगावासादरम्यान सॉफ्टवेअर बनवणाऱ्या कैद्याचे कौतुक


नवी दिल्ली – १३ महिन्यांसाठी तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आलेल्या सॉफ्टवेअर इंजिनिअर अमित मिश्राने या कालावधीमध्ये एक सॉफ्टवेअर तयार केले असून त्याने तयार केलेले हे सॉफ्टवेअर तुरुंगाचे व्यवस्थापन सुधारण्यासंदर्भातील आहे. सर्वोच्च न्यायालय आणि इतर वकींलांनाही अमितने तयार केलेले सॉफ्टवेअर पाहून आश्चर्याचा धक्का बसला असून त्यांनीही या कामासाठी अमितचे कौतुक केले आहे.

यासंदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाइम्सने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार अमितच्या पत्नीने काही वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती. अमितला या प्रकरणामध्ये अटक करण्यात आल्यानंतर १३ महिन्यांसाठी त्याला हरयाणामधील ग्रुरुग्राममधील तुरुंगामध्ये ठेवण्यात आले होते. त्याने याच कालावधीत हे सॉफ्टवेअर तयार केले. एक वर्ष तुरुंगामध्ये राहिल्यानंतर अमितची निर्दोष मुक्तता करण्यात आली. पण अमितने तुरुंगात राहून तयार केलेल्या सॉफ्टवेअरमुळे आता त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

सर्वोच्च न्यायालयानेही सोमवारी अमितचे कौतुक केले. न्या. संजय किशन कौल आणि न्या. हेमंत गुप्ता यांच्या द्विसदस्यीय खंडपीठाने सर्व राज्यांनी अमितने बनवलेले सॉफ्टवेअर पहावे असा सल्ला दिला आहे. हे सॉफ्टवेअर तुरुंगांमधील सुधारणांसाठी उपयोगी ठरु शकते. त्यामुळेच केवळ हरयाणाचा नाही तर देशातील इतर राज्यांनाही या सॉफ्टवेअरचा वापर शक्य आहे का यासंदर्भातील विचार करावा, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

आजीवन तुरुंगवासाची शिक्षा सामान्यपणे कोणालाही सुनावण्यात आल्यानंतर मरेपर्यंत ती व्यक्ती तुरुंगामध्येच असते. पण अशा व्यक्तींना राज्य सरकार आणि तुरुंग प्रशासनाला १४ वर्षांनंतर सोडून देण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. यासंदर्भातील निर्णय तुरुंगामधील वागणुकीच्या आधारे घेतला जातो. अमितने बनवलेल्या सॉफ्टवेअरमुळे कोणत्याही कैद्यासंदर्भातील रियल टाइम एन्ट्री करता येते. म्हणजेच हा कैदी तुरुंगामध्ये कसा राहतो, काय करतो, इतरांशी कसा वागतो या सर्व गोष्टींची सॉफ्टवेअरच्या मदतीने नोंद ठेवता येणार आहे. फिनिक्स असे नाव या सॉफ्टवेअरला देण्यात आले आहे.

हरयाणामधील १९ जिल्ह्यांमध्ये सध्या हे सॉफ्टवेअर वापरले जात आहे. त्याचबरोबर राजस्थानमधील ३८, उत्तर प्रदेशमधील ३१ आणि हिमाचल प्रदेशमधील १३ जिल्ह्यांमध्ये या सॉफ्टवेअरची मदत तुरुंग प्रशासनाकडून घेतील जात असल्याचे अमितने सांगितले आहे.