राज्य सरकारने राज्यपालांकडे पाठवलेल्या अभिभाषणावरुन फडणवीस बरसले


मुंबई: सत्ताधारी महाविकास आघाडी विरुद्ध विरोधी पक्ष भाजप यांच्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमित्ताने जोरदार वाकयुद्ध रंगल्याचे पाहायला मिळत असून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना आज अनेक मुद्द्यांवरून सरकारवर टीकेचे बाण सोडले. राज्यपालांनी केलेल्या १२ पानी भाषणात मला कुठेही यशोगाथा दिसली नाही. जसे एखाद्या चौकात भाषण केले जाते तसेच भाषण राज्य सरकारने राज्यपालांकडे पाठवल्याचे म्हणत फडणवीस यांनी निशाणा साधला.

मला राज्यपालांचे भाषण ऐकल्यानंतर प्रश्न पडला. साहित्याचे अनेक प्रकार आहेत त्यातल्या कोणत्या प्रकारात हे भाषण मोडते हे पडताळले असता हे एखाद्या चौकातील भाषण असल्याचे माझे मत बनले. त्यात यशोगाथा नाही, तर व्यथा आणि वेदनाच दिसल्या, असे नमूद करताना यमक जुळवणारी भाषा यशाचे गमक होऊ शकत नाही, असा टोला फडणवीसांनी हाणला.

आपण सरकार म्हणून बाजू मांडतो तेव्हा समर्पक आकडेवारी मांडायची असते, यात ती कुठेच दिसली नाही. आपल्या अपयशाचा लेखोजोखा समोर येईल, या भीतीने सरकारने आकडेवारी लपवली आहे. जंबो कोविड सेंटर्समध्ये कुणाकुणाची घरे भरली याचा तपशील दिला असतात, तर बरे वाटले असते, असा टोलाच फडणवीस यांनी लगावला.

कोरोना नियंत्रणासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी ‘ ही मोहीम राबवण्यात आली. ही मोहीम यशस्वी ठरल्याचा सरकारने दावा केलेला आहे. फडणवीस यांनी त्यावरून टोलेबाजी केली. माझे कुटुंब माझी जबाबदारी असे जनतेला सांगून सरकारने एकप्रकारे हात झटकण्याचे काम केल्याचे नमूद करत राज्यातील कोरोना स्थितीवर फडणवीसांनी बोट ठेवले.

देशातील ४० टक्के कोरोनाबाधित महाराष्ट्रात आहेत आणि एकूण मृत्यूंच्या ३५ टक्के मृत्यू आपल्या राज्यात झाले आहेत. तरीही सरकार काय म्हणून आपली पाठ थोपटून घेत आहे?, असा सवाल फडणवीस यांनी केला. जी रुग्णसंख्या सध्या वाढली आहे ती खरी आहे की वाढवली, असा सवाल विचारताना फडणवीस यांनी लॉकडाऊनवरूनही निशाणा साधला. लॉकडाऊन करण्यासाठी सगळेच तत्पर आहेत. मंत्री, अधिकारी कुणी मनात येईल, तो लॉकडाऊन करत असल्याचे सांगत फडणवीसांनी यावर आक्षेप घेतला.

सरकारी विमानातून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना प्रवास नाकारण्यात आला होता. राज्यपालांना विमानात १५ मिनिटे बसून राहिल्यानंतर उतरावे लागले व दुसऱ्या विमानाने रवाना व्हावे लागले होते. फडणवीस यांनी त्यावरून सरकारवर तोफ डागली. राज्यपाल व सरकार यांच्यामध्ये अ. र. अंतुले व विलासराव देशमुख यांच्या काळातही वाद झाले होते, पण राज्यपालांबाबत असा प्रकार कधी घडला नाही.

राज्यपाल विमानात जाऊन बसल्यानंतर त्यांना प्रवासाची परवानगी नाकारण्यात आली. हा एका व्यक्तीचा नाही तर त्या पदाचा अपमान असल्याचे फडणवीस म्हणाले. मुख्यमंत्री वा राज्यपाल यापैकी कुणाला विमान द्यायचे असा प्रसंग येतो, तेव्हा राज्यपालांना विमान दिले जाते, असे नमूद करताना फडणीसांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. त्या विमानात इंधन का भरले गेले होते?, राज्यपालांना परवानगी दिली नव्हती मग त्यांना बोर्डिंग पास कसा मिळाला?, ते विमानात जाऊन कसे बसले?, अशा प्रश्नांची सरबत्ती सरकारवर करतानाच राज्यपाल व तुमच्यात काही मतभेद असतीलही पण त्यावरून मनाचा एवढा कोतेपणा दाखवू नका, असा सल्लाच फडणवीसांनी सरकारला दिला. ज्या राज्यपालांना तुम्ही रोज अपमानित करता, आज त्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव आला याचे समाधान वाटते, असेही यावेळी फडणवीस म्हणाले.