उद्धव ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख असते, तर त्यांनी राठोडांना फाडून खाल्ले असते -चित्रा वाघ


नाशिक – भाजप प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी पूजा चव्हाण प्रकरणावरून महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला. संजय राठोड बलात्कारी असून, एका बलात्काऱ्याला वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून मला अपेक्षा आहेत. मुख्यमंत्रीपदावर उद्धव ठाकरे नसते आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख असते, तर त्यांनी राठोडांना फाडून खाल्ले असते, असे म्हणत वाघ यांनी राठोड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

नाशिक येथे भाजप नेत्या चित्रा वाघ यांची पत्रकार परिषद झाली. त्यांनी यावेळी पूजा चव्हाण प्रकरणावरून राज्य सरकार आणि पोलिसांना काही सवाल उपस्थित केले. संजय राठोडांचे पूजा चव्हाणच्या मोबाईलवर ४५ मिस्ड कॉल आले आहे. पोलिसांकडे तो मोबाईल आहे. पोलिसांनी त्याबाबतची काहीही माहिती दिलेली नाही. आपल्याला फक्त याप्रकरणात अंदाज बांधायचे आहेत. कारण मराहाष्ट्रातील जनतेला काहीही माहिती नाही की, पूजा चव्हाण प्रकरणात नेमके काय झाले?

पूजाच्या मृत्यूच्या दिवशी अरुण राठोडने १०० या नंबरवर कॉल करुन सर्व कबुली दिली होती. यात माझा कुठलाही हात नाही. हे सर्व संजय राठोड यांच्यामुळे, असे त्याने सागितल्यानंतर त्याला समोरच्या कंट्रोल रुमच्या महिला पोलीस कर्मचाऱ्याने एक नंबर दिला. तो ९१४६८७०१०० हा नंबर, त्यांनी त्याला दिला. या नंबरवर कॉल करायला सांगितले. सकाळी ८.४० मिनिटांनी या नंबरवर फोन गेला. मग या क्रमांकावरील व्यक्तीला अरुण राठोडने पुन्हा सर्व कबुली दिली. त्यानंतर अरुणला थांबवण्यात आल्यानंतर या क्रमांकावरुन तिसऱ्या व्यक्तीला कॉन्फरन्स कॉलवर घेतले. त्या कॉलवर पुन्हा एकदा सर्व सांगण्यात आली, आता ते दोन व्यक्ती कोण होते?, असा सवाल चित्रा वाघ यांनी उपस्थित केला.

संजय राठोडचा ऑडिओ क्लिपमधील आवाज आहे, हे शेंबडे पोरगेही सांगेल. तरीही काहीही कारवाई झाली नाही. तक्रार नाही. कोण आहे यांचा बाप हे सर्व करवून घेणारा? याआधी मी या तिन्ही पक्षाची एकी कुठेही पाहिली नाही. एकी कुठे झाली, तर बलात्काऱ्याला वाचवण्यात झाली. एकाने खुर्ची वाचवली, दुसरा त्याच मार्गावर चालला आहे. धनंजय मुंडे प्रकरणी आम्ही तोंडघाशी पडल्याचे म्हणण्यात आले. मग का रेणू शर्मावर गुन्हा दाखल केला नाहीत? सरकार तुमचे, पोलीस तुमचे. गुन्हा दाखल करायची हिम्मत दाखवा.

मुख्यमंत्र्यांच्या मांडीला मांडी लावून बलात्कारी बसला आहे. षंढासारखे बसून राहणार हे सरकार नामर्द आहे. पण मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्राच्या जनतेला अपेक्षा आहे. मला अपेक्षा आहेत. आम्ही सातत्याने बोलतो पण, साधा एफआयआर होत नाही. मला मुख्यमंत्र्यांना विचारायचे खुर्चीत बसल्यावर एवढी वाईट परिस्थिती होते का? आज उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नसते, शिवसेनेचे पक्षप्रमुख असते, तर संजय राठोडला फाडून खाल्ले असते, असे चित्रा वाघ म्हणाल्या.