मुंबई महानगरपालिकेने घेतला हे प्रसिद्ध मैदान बंद करण्याचा निर्णय


मुंबई – मुंबई महानगरपालिकेकडून कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होत असल्यामुळे विविध उपाययोजना केल्या जात असून निर्बंधही आणले जात आहेत. मुंबईतील रुग्णसंख्येत गेले दोन दिवस घसरण नोंदवण्यात आली होती. पण, तब्बल १,१६७ मुंबईकरांना बुधवारी कोरोनाची बाधा झाल्याची नोंद होताच यंत्रणांचे धाबे दणाणले. मुंबई महानगरपालिकेने या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेतला असून मुंबईतील प्रसिद्ध मैदानांपैकी एक मैदान बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबईतील प्रसिद्ध मैदानांपैकी एक असणारे ओव्हल मैदान मुंबई महानगरपालिकेने शुक्रवार म्हणजेच २६ फेब्रुवारीपासून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. महानगरपालिका अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या मैदानावर पुढील आदेशापर्यंत कोणत्याही प्रकारचा खेळ किंवा इतर गोष्टींसाठी परवानगी दिली जाणार नाही. हे मैदान गुरुवारी संध्याकाळी सात वाजल्यापासून बंद करण्यात येणार आहे.

महानगरपालिकेच्या ए वॉर्डमधील सहाय्यक नगरपालिका आयुक्त चंदा जाधव यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पूर्वकाळजी म्हणून आम्ही मैदान पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती दिली आहे. चर्चगेटमध्ये असणाऱ्या ओव्हल मैदानात क्रिकेट. फूटबॉल खेळण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. अगदी ठाणे, कल्याण, अंबरनाथ, विरारपासून तरुण या मैदानावर खेळण्यासाठी येत असतात. याशिवाय जॉगिंग तसंच मॉर्निग वॉकसाठीही गर्दी होत असते.

गेल्या आठवड्यात चंदा जाधव यांनी मैदानावर जाऊन पाहणी केली असता कोरोना रुग्ण वाढत असतानाही तेथील गर्दी कमी होत नसल्याचे निदर्शनास आले होते. दरम्यान ज्या ठिकाणी गर्दी होत आहे अशा सार्वजनिक ठिकाणांवर निर्बंध आणण्यासंबंधी मुंबई पालिकेने वॉर्ड स्तरावर निर्णय घेण्यास सांगितले आहे.

बुधवारी तब्बल एक हजार १६७ जणांना मुंबईत कोरोनाची बाधा झाली तर ४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ०.२४ टक्क्यांवर रुग्णवाढीचा दरही पोहोचला आहे. मुंबईतील रुग्णसंख्येत गेल्या काही दिवसांपासून वाढ होत होती. त्यामुळे नियम तोडणाऱ्यांविरुद्ध कारवाई तीव्र करण्यात आली आहे. गेले दोन दिवस रुग्णसंख्या उतरणीला लागली होती. पण, बुधवारी रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे चाचणी अहवालावरून स्पष्ट झाले. आतापर्यंत मुंबईत तीन लाख २१ हजार ६९८ जणांना कोरोना झाला आहे. तर तीन लाख एक हजार ५७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण ९४ टक्क्यांवर स्थिर आहे.

सरासरी २९४ दिवसांवर रुग्णदुपटीचा कालावधी घसरला आहे. गेल्या २४ तासांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांचा शोध घेण्यासाठी सुमारे २१ हजार १२३ चाचण्या करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत ३१ लाख ८५ हजार ३३४ चाचण्या करण्यात आल्या आहेत. गेल्या २४ तासांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या जोखमीच्या गटातील सहा हजार ७३ संशयित रुग्णांचा शोध घेण्यात महानगरपालिकेला यश आले.