राज्याच्या कोरोना टास्क फोर्समधील डॉक्टरांचे दुसऱ्या लाटेसंदर्भात महत्वाचे भाष्य


मुंबई – बुधवारी राज्याची राजधानी मुंबईसहीत संपूर्ण राज्यामध्येच दैनंदिन कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ नोंदविण्यात आली. कोरोनाचे ८,८०७ नवे रुग्ण राज्यात दिवसभरात आढळले. त्यात समावेश आहे. राज्याबरोबरच मुंबईतील ही वाढ चिंताजनक आहे. त्यातच दिलासा देणारे वृत्त म्हणजे कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या कमी झाली असून बुधवारी कोरोनामुळे मरण पावलेल्या मुंबईमधील रुग्णांची संख्या केवळ चार होती. पण असे असले तरी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव ही चिंतेची बाब असून कोरोना टास्क फोर्समधील डॉक्टरांनी यासंदर्भात इशारा देताना राज्यातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसंदर्भात महत्वाचे भाष्य केले आहे.

राज्यामध्ये कोरोनामुळे झालेल्या ८० मृत्यूंपैकी २७ मृत्यू हे मागील ४८ तासांमध्ये झाले आहेत. राज्यामधील कोरनाबाधितांच्या संख्येमध्ये होणाऱ्या वाढीसंदर्भात कोरोना टास्क फोर्सचे सदस्य असणाऱ्या डॉक्टर राहुल पंडित यांनी चिंता व्यक्त केली आहे. टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना मागील दोन आठवड्यांमध्ये गंभीर प्रकरणे आणि मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढल्याचे पंडित यांनी म्हटले आहे. पंडित यांनी क्रिटीकल केसेस आणि मृत्यूचे प्रमाण मागील ७ ते १४ दिवसांमध्ये रुग्णवाढ झाल्यानंतर वाढले असल्याचे सांगतानाच पुढील १० दिवसांमध्ये मुंबईमधील कोरोना परिस्थिती भविष्यात कशी असेल यासंदर्भातील अंदाज बांधता येईल, असे म्हटलं आहे. पुढील दहा दिवस मुंबई शहरासाठी करो या मरो अशापद्धतीचे असतील असे संकेत देताना पंडित यांनी बुधवारी जवळजवळ दोन महिन्यानंतर आमच्या रुग्णालयामधील आयसीयू बेडसंदर्भातील विचारणा वाढल्याची माहिती दिली.

यासंदर्भात अतिरिक्त पालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिलेल्या माहितीनुसार २१ हजारांहून अधिक चाचण्या बुधवारी करण्यात आल्या आहेत. कोरोनाची प्रकरणे आणि पॉझिटीव्ही रेटमध्ये वाढ झाली असून सहा टक्क्यांची ही वाढ आहे. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहोत आणि जम्बो कोव्हिड सेंटर्सला बेडची सोय तयार ठेवण्यासंदर्भातील सूचना करण्यात आल्या असल्याचेही काकाणी यांनी स्पष्ट केले आहे.

राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेणारी आकडेवारी काल पार पडलेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये सादर करण्यात आली. कोरोनाचा वाढता संसर्ग आणि लसीकरण मोहिमेसंदर्भातील आकडेवारीचा यामध्ये समावेश होता. कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व जिल्ह्यांमध्ये कोरोना चाचण्या वाढवण्याचे आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर देण्याचे आदेश दिले आहेत. याच बैठकीमध्ये आरोग्य विभागाने फेब्रुवारी महिन्यामध्ये सरकारी प्रकरणांमध्ये वाढ झाली असली तर मृत्यूदर कमी असल्याचे म्हटले आहे.

जानेवारी महिन्यामध्ये दैनंदिन कोरोना रुग्णांचे प्रमाण दोन हजार ९७३ एवढे होते. तर मृत्यूदर हा १.७ टक्के होता. फेब्रुवारी महिन्यातील दैनंदिन कोरोना रुग्णांचा आकडा हा तीन हजार ३४७ एवढा आहे. तर मृत्यूदर ०.४ टक्के एवढा आहे. दोन हजार १८ नव्या रुग्णांची मुंबई आणि उपनगरांमध्ये बुधवारी नोंद झाली. त्या खालोखाल पुणे आणि परिसरामध्ये एक हजार ८११ रुग्ण, अकोल्यात एक हजार ६७९ रुग्ण, नागपूरमध्ये एक हजार ३२३ रुग्ण आढळून आले. नागपूरमध्ये महापालिका क्षेत्रामध्ये १२ जणांचा बुधवारी कोरोनामुळे मृत्यू झाला.

यासंदर्भात टास्क फोर्समधील सदस्य असणाऱ्या डॉक्टर शशांक जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यामध्ये पुढील १० दिवसांमध्ये कोरोनाची दुसरी लाट येणार की नाही हे ठरेल. यंदा विदर्भामधून कोरोना रुग्णांची वाढ सुरु झाली आहे. नवीन कोरोना विषाणूंचा स्ट्रेनचा या रुग्णवाढीमध्ये सहभाग नसेल असे म्हणता येणार नाही, अशी प्रतिक्रिया जोशी यांनी दिली. तसेच आधी कोरोनाचा संसर्ग ज्या लोकांना झाला नव्हता आता ते अधिक फिरु लागल्याने कोरोना संसर्ग झालेल्यांची संख्या वाढली असल्याची शक्यताही जोशी यांनी व्यक्त केली आहे.

कोरोनाबाधितांची संख्या कल्याण आणि डोंबिवलीमध्येही वाढल्याचे चित्र दिसत आहे. बुधवारी येथे कोरोनाचे १६५ नवे रुग्ण आढळले असून दोन जणांचा मृत्यू झाला आहे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये १३० नवे रुग्ण आणि दोन मृत्यू तर पुणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये बुधवारी ५५ नवे रुग्ण आणि एक मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.