आयबीएमच्या अहवालात धक्कादायक माहिती उघड; गेल्या वर्षी भारतावर झाले सर्वाधिक सायबर हल्ले


नवी दिल्ली: आयबीएमने जगातील विविध देशांवर होणाऱ्या सायबर हल्ल्यांच्या बाबतीत एक अहवाल तयार केला असून आशिया-प्रशांत म्हणजेच इंडो- पॅसिफिक प्रदेशात सर्वाधिक सायबर हल्ले हे जपानवर झाले असून त्यानंतर भारताचा क्रमांक लागतो, असे या अहवालात सांगितले आहे.

आयबीएमच्या सिक्युरिटी एक्स-फोर्सने सांगितले की जगात बहुतांश ठिकाणी गेल्या वर्षी कोरोनामुळे खाजगी कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करायला सांगितले होते. हॉस्पिटल, संशोधन, फार्मास्युटिकल, उर्जा तसेच अनेक आयटी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांचा यामध्ये समावेश होतो. सायबर हँकर्सनी या कंपन्यांना मोठ्या प्रमाणावर लक्ष केल्याचे दिसून आले आहे.

आयबीएमच्या या अहवालात असे देखील सांगण्यात आले आहे की इंडो-पॅसेफिक भागात गेल्या वर्षी सर्वाधिक सायबर हल्ले हे जपान या देशावर झाले आहेत. त्यानंतर भारताचा क्रमांक लागतो. यातील जवळपास सात टक्के सायबर हल्ले हे भारतीय कंपन्यांवर करण्यात आले आहेत. आर्थिक क्षेत्रांशी संबंधित कंपन्या आणि विमा कंपन्यांवर 60 टक्के सायबर हल्ले झाले आहेत. त्यानंतर इतर सेवांचा क्रमांक लागतो.

पाकिस्तान आणि चीनमधील हॅकर्सकडून भारतावर होणारे सायबर हल्ले हे प्रामुख्याने केले जातात असे समोर आले आहे. या हॅकर्सना कोरोना काळात वर्क फ्रॉम होममुळे सायबर हल्ले करायला सोपे गेल्याचे समोर आले आहे. गेल्या काही काळात अमेरिकेवरही मोठ्या प्रमाणात सायबर हल्ले झाल्याचे दिसून आले आहे. हे सायबर हल्ले प्रामुख्याने रशिया आणि चीन या देशांतून करण्यात येत असल्याचे समोर आले आहे. या काळात कोरोनाच्या लस निर्मीती कंपन्यांच्या सर्व्हरवरही सायबर हल्ले झाल्याचे दिसून आले आहे.