मुंबईतील ८५ टक्के कोरोनाबाधितांमध्ये कोणतीही लक्षणे नाही


मुंबई: राज्यातील पुन्हा एकदा कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून मुंबईतील रुग्णसंख्या देखील झपाट्याने वाढत असल्यामुळे चिंतेचे वातावरण आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखता यावा यासाठी मुंबई महानगरपालिका शर्थीचे प्रयत्न करत आहे. कोरोनाबाधितांची संख्या अशीच वाढत राहिली तर विविध निर्बंधांबरोबर शेवटी शासनाला लॉकडाउनचा विचार करावा लागणार आहे. दरम्यान मुंबईत सापडणाऱ्या बहुसंख्य कोरोनाबाधितांमध्ये कोणतीही लक्षणे दिसत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

लक्षणे न आढळणाऱ्या कोरोनाबाधितांची माहिती मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल चहल यांनी दिली आहे. मुंबईत दररोज सापडणाऱ्या पॉझिटिव्ह रुग्णांपैकी जवळजवळ ८० ते ८५ टक्के रुग्णांमध्ये कोरोनाची कोणत्याही प्रकारची लक्षणे आढळलेली नसल्याचे चहल यांनी म्हटले आहे. बुधवारी मुंबईत ११०० पेक्षा अधिक कोरोनाबाधित सापडले. पण या ११०० पैकी ८३ टक्के रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळली नसल्याचे चहल यांनी सांगितले आहे.

राज्यातील विविध रुग्णालयांमध्ये एकूण ७८ टक्के रुग्ण उपचारासाठी दाखल आहेत. तर मुबईत सक्रिय रुग्णांची संख्या ४९ टक्के एवढी आहे. मागील काही आठवड्यांची आकडेवारी तपासली असता त्यांपैकी सुमारे ७८ ते ७२ टक्के रुग्णांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसलेली नसल्याची माहिती अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकानी यांनी दिली आहे. विशेष म्हणजे ज्या रुग्णांना कोणतीही लक्षणे आढळत नाहीत, अशांना दाखल करून घेऊ नका असे निर्देश महापालिका आयुक्त चहल यांनी खासगी रुग्णालयांना दिले आहेत. दरम्यान, कोरोनावर उपाययोजनेचा भाग म्हणून प्रशासनाने नियम कडक केले आहेत. बाहेर फिरताना मास्क वापरणे अनिवार्य असून मास्क न वापरणाऱ्यांविरोधात कठोर पावले उचलण्यात येत आहेत.