पोहरादेवी येथील गर्दीची मुख्यमंत्र्यांनी घेतली गंभीर दखल; दिले तात्काळ कारवाईचे आदेश


मुंबई आज सकाळपासून जिल्ह्यातील पोहरादेवी येथे झालेल्या गर्दीबाबत माध्यमांत येत असलेल्या बातम्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली असून अशा रीतीने कोरोना संकटाच्या काळात आरोग्याचे नियम न पाळता गर्दी होत असेल तर संबंधितांवर जिल्हा व पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. तसेच याचा अहवाल वाशीम जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना देण्यास सांगण्याच्या सूचना मुख्य सचिवांना दिल्या आहेत.

आज पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आरोप होत असलेले संजय राठोड यांनी सपत्नीक पोहरादेवीच्या दर्शनासाठी पोहोचले होते. त्यांनी तिथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत आपल्यावर होत असलेल्या आरोपांवर स्पष्टीकरण दिले. पण आज सकाळपासूनच पोहरा देवी गडावर संजय राठोड यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. तसेच, घरातून निघाल्यानंतर त्यांच्यासोबत मोठ्याप्रमाणात गाड्यांचा ताफादेखील होता. कोरोनाच्या संकटाने राज्यात पुन्हा उचल खाल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी राजकीय, सामाजिक कार्यक्रमांवर निर्बंध आणल्यानंतर मंत्रिमंडळातील नेत्याकडूनच नियमांचे उल्लंघन झाल्याच्या आरोप विरोधकांनी केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोहरादेवी येथे झालेल्या गर्दीबाबत कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

मुख्यमंत्र्यांनी आज राज्यातही कोरोना परिस्थितीसंदर्भात वर्षा येथे एका बैठकीत आढावा घेतला, तसेच मुंबई महानगर क्षेत्रातील महानगरपालिका आयुक्तांशी देखील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासंदर्भात करीत असलेल्या उपाय योजनांबाबत मार्गदर्शन केले. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, आपण गेले वर्षभर अतिशय संयमाने व निर्धाराने कोरोना विरोधातील लढाई लढत आहोत. आपले अनेक आरोग्य कर्मचारी, पोलीस तसेच प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी जीवावर उदार होऊन हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे या संपूर्ण काळात सर्व महत्वाचे धार्मिक सण आणि उत्सव नागरिकांनी शांततेत आणि शासनाने आखून दिलेल्या नियमाप्रमाणे पार पाडले. या काळात मोठमोठी धार्मिक स्थळे देखील नियमांचे पालन करीत होती आणि आता देखील मिशन बिगिन अगेनमध्ये या कार्यपद्धतीचे पालन करणे आपली जबाबदारी आहे.

माझ्या सोशल मीडिया लाईव्हच्या माध्यमातून मी परवाच सर्व प्रकारच्या धार्मिक, राजकीय, सामाजिक कार्यक्रमांना परवानगी मिळणार नाही हे याचसाठी सांगितले होते, कारण कोरोनाची दुसरी लाट येणे आपल्या सगळ्यांसाठी काळजीचा विषय आहे. आम्ही शासन म्हणून तयारच आहोत पण नागरिक म्हणून प्रत्येकाची वैयक्तिक जबाबदारी असल्याचे हे सर्वानी लक्षात ठेवावे, असेही मुख्यमंत्री स्पष्ट केले आहे.