लॉकडाउनसंबंधी अल्टिमेटम दिल्यानंतर उद्धव ठाकरेंनी बोलावली महत्वाची बैठक


मुंबई – राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होऊ लागल्यामुळे पुन्हा एकदा लॉकडाउन होणार का? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला सतावू लागला आहे. कोरोनासंबंधी नियमांचे नागरिकांकडून योग्य पालन होत नसल्यामुळे कोरोनाबाधितांची आकडेवारी वाढत असल्याचे सांगितले जात आहे. रुग्णवाढीची आकडेवारी आणि नागरिक शिस्तपालन करतात की नाही, हे तपासून लॉकडाउन लागू करण्याबाबत आठ-दहा दिवसांनी निर्णय घेतला जाईल असा अल्टिमेटम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्यानंतर उद्धव ठाकरेंनी आज महत्वाची बैठक बोलावली आहे.

आज मुंबई महापालिका आयुक्त आणि अधिकाऱ्यांची मुख्यंमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठक बोलावली आहे. या बैठकीत उद्धव ठाकरे मुंबईतील स्थितीचा आढावा घेणार आहेत. सोमवारपासून काही दिवसांसाठी राज्यातील वाढता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सर्व प्रकारचे सार्वजनिक कार्यक्रम आणि आंदोलनांवर बंदी घालण्यात येत असल्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी रविवारी केली. रुग्णवाढीची आकडेवारी आणि नागरिक शिस्तपालन करतात की नाही, हे तपासून टाळेबंदी लागू करण्याबाबत आठ-दहा दिवसांनी निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले होते.

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव झपाटय़ाने होत असून दरदिवशी नव्याने निदान होणाऱ्या रुग्णांची संख्या हजारापर्यत पोहोचली आहे. रुग्णालयांच्या तयारीचा यादृष्टीने आढावा घेण्यासाठी पालिका आयुक्त इक्बाल सिंह सोमवारी बैठक आयोजित केली होती. यात पालिकेच्या रुग्णालयांसह खासगी रुग्णालये, प्रयोगशाळांचे प्रतिनिधी सहभागी होते. लक्षणे नसलेल्या रुग्णांना दाखल करू नये. दाखल रुग्ण आणि उपलब्ध खाटा याची माहिती देणारे डॅशबोर्ड आणि रुग्णालयातील फलक वेळोवेळी अद्ययावत केले जावेत, अशा सूचना यावेळी रुग्णालयांना देण्यात आल्या.

अजूनही कोरोनाबाधितांसाठी खासगी रुग्णालयातील ८० टक्के खाटा राखीव आहेत. मधल्या काळात रुग्णसंख्या कमी झाल्याने या खाटा कमी करण्याचा प्रस्ताव आम्ही मांडला होता. पण रुग्णसंख्या आता पुन्हा वाढत असल्यामुळे ही मागणी मागे घेतली आहे. खासगी रुग्णालयातील सर्व खाटा सोईसुविधांसह सज्ज असल्यामुळे रुग्णसंख्या कितीही वाढली तरी उपचार वेळेत दिले जातील, असे खासगी रुग्णालयाचे समन्वयक आणि बॉम्बे रुग्णालयाचे कन्सल्टंट फिजिशियन डॉ. गौतम भन्साली यांनी सांगितले आहे.