अझीम प्रेमजींच्या या सल्ल्याने ६० दिवसांत होऊ शकते ५० कोटी लोकांचे लसीकरण


नवी दिल्ली – सध्या टप्प्याटप्याने देशात कोरोना लसीकरण मोहिम सुरु असतानाच ६० दिवसांत ५० कोटी लोकांचे लसीकरण करणे शक्य असल्याचे विप्रोचे संस्थापक अझीम प्रेमजी यांनी म्हटले आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना लसीकरण मोहिमेत खासगी क्षेत्राला सहभागी करुन घेतले जावे, असा सल्ला अझीम प्रेमजी यांनी दिला. लसीकरण मोहिमेत खासगी क्षेत्रालाही सामावून घेतल्यास फक्त दोन महिन्यात देशभरातील ५० कोटी लोकांचे लसीकरण केले जाऊ शकते, असा दावा त्यांनी केला आहे.

जर सरकारने लवकरात लवकर खासगी क्षेत्राला या मोहिमेत सहभागी करुन घेतले तर ६० दिवसांत ५० कोटी लोकांचे लसीकरण करण्याचा टप्पा आपण गाठू शकतो, असे आश्वासन आम्ही देऊ शकतो, असा विश्वास अझीम प्रेमजी यांनी व्यक्त केला आहे. अझीम प्रेमजी यांनी हा सल्ला बंगळुरु चेंबर ऑफ इंडस्ट्री अॅण्ड कॉमर्समध्ये आयोजित चर्चासत्रादरम्यान दिला. हे शक्य असून खासगी क्षेत्राचा सहभाग लसीकरणाच्या टक्केवारीला चांगली गती मिळेल, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

त्यांनी पुढे बोलताना सांगितले की, आपण रेकॉर्ड वेळेत कोरोनाविरोधातील प्रतिबंधक लस आणली असून आता ती मोठ्या प्रमाणात पोहोचवण्याचे आव्हान आहे. सरकार आपल्याला शक्य ते सर्व करत असल्याचे मान्य करत खासगी क्षेत्राचा सहभाग यामध्ये मदतशीर ठरु शकतो, असे अझीम प्रेमजी यांनी यावेळी म्हटले.

३०० रुपये दराने सीरम इन्स्टिट्यूटकडून लसीचा एक डोस मिळण्याची शक्यता आहे आणि रुग्णालये, खासगी नर्सिंग होम प्रत्येक डोस १०० रुपये किंमतीने देतात. म्हणजे प्रत्येकी ४०० रुपये खर्चाने आपण जास्तीत जास्त लोकांना कोरोना लस देऊ शकतो, असे अझीम प्रेमजी यांनी म्हटले आहे.

कोरोना संकटात मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत करणाऱ्या अझीम प्रेमजी यांनी करोना हा आपल्या देशातील आरोग्य व्यवस्थेसाठी ‘वेक अप कॉल’ असल्याचे अधोरेखित केले आहे. आतापर्यंत देशभरातील १ कोटी ११ लाख कोरोना योद्धे आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस घेण्यात आली आहे.