पुढील ८ ते १५ दिवस मुंबईसाठी महत्त्वाचे; महापालिका आयुक्तांचा निर्वाणीचा इशारा


मुंबई – दिवसेंदिवस मुंबईतील कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण चाचण्याच्या तुलनेत वाढेल असून, काही दिवसांतच मुंबईतील पॉझिटिव्ही रेट चार टक्क्यांवरून सहा टक्क्यांच्या पुढे गेला आहे. मुंबईतील कोरोनाबाधितांच्या संख्येत मागील पंधरा दिवसांत तिपटीने वाढ झाली असल्यामुळे महापालिकेच्या चिंतेत मोठी भर पडली आहे. महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी या पार्श्वभूमीवर मुंबईकराना निर्वाणीचा इशारा दिला आहे.

एबीपी माझा या वृत्तवाहिनीला आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी मुलाखत दिली. त्यांनी या मुलाखतीत मुंबईतील कोरोना परिस्थितीवर भाष्य केले आहे. आयुक्त चहल मुंबईतील वाढत्या रुग्णसंख्येबद्दल बोलताना म्हणाले, कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे धोका वाढला आहे. नागरिकांनी शिस्त पाळली नाही आणि आता हजारो लोक विनामास्क फिरताना दिसत आहे. आम्ही काल (२१ फेब्रुवारी) १६ हजार ४०० लोकांकडून दंडवसुल केला. १६ लाख लोकांकडून मागील तीन महिन्यात दंड आकारला आहे. आता दररोज विनामास्क सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्या २५ हजार लोकांकडून दंड वसूल करण्याचे उद्दिष्ट्य देण्यात आल्याची माहिती आयुक्तांनी दिली.

यासंदर्भात माझ्याकडे दोन व्हिडीओ आले आहेत. एक व्हिडीओ चौपाटीवरचा होता. हजारो लोक तिथे होते. विनामास्क तिथे लोक फिरत होते. एक लग्नातील व्हिडीओ आला. तिथेही हेच दृश्य पहायला मिळाले होते. त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन दंड ठोठावला. अनेक ठिकाणी पबवरही धाडी टाकल्या. हा सगळा बेशिस्तपणा असल्याचे म्हणत आयुक्तांनी आपली नाराजी व्यक्त केली.

कोरोना संपला असल्याचे लोकांना वाटत आहे आणि लोक जसे वागत आहेत, ते फार धोक्याचे असल्यामुळे लॉकडाउन होणार की नाही हे लोकांनी ठरवायचे हे मुख्यमंत्री योग्यच बोलले आहेत. शिस्त लोकांनी पाळायला हवी. मास्क वापरायला हवा. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळायला हवे. लोकांनी लग्न समारंभात गर्दी केली नाही, तर लॉकडाउनची वेळ येणारच नाही. पण, हजारोंच्या संख्येने लोक विनामास्क बाहेर फिरायला लागले, तर आपल्याला लॉकडाउन टाळताच येणार नाही. मुंबईसाठी पुढील ८ ते १५ दिवस फार महत्त्वाचे असल्याचा इशारा आयुक्त चहल यांनी दिला आहे.