कोरोनाबाधितांची नवी आकडेवारी भारतीयांच्या चिंतेत भर घालणारी


नवी दिल्ली – मागील २४ तासांमध्ये भारतामध्ये कोरोनाचे १४ हजार १९९ रुग्ण आढळून आले आहेत. भारतामधील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा या रुग्णसंख्येसोबतच एक कोटी १० लाखांच्या वर गेला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार देशात सलग पाचव्या दिवशी कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली असून ही चिंतेची बाब असल्याचे सांगण्यात येत आहे.

कोरोनाबाधितांची आकडेवारी दिवसोंदिवस वाढत असल्यामुळे कोरोनाची दुसरी लाट आली की काय अशी चर्चा दबक्या आवाजात आता सुरु झाली आहे. सरकारी यंत्रणा आणि तज्ज्ञांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसंदर्भात स्पष्टपणे कोणतीही थेट भूमिका स्पष्ट केली नसली तरी सध्या सुरु असणारी रुग्णवाढ ही नोव्हेंबरनंतरची सर्वात मोठी वाढ आहे. धक्कादायक बाब म्हणजे सर्वाधित रुग्णांची वाढ ही महाराष्ट्रात झाली आहे.

कोरोनामुळे देशभरामध्ये रविवारी ८३ जणांचा मृत्यू झाला आहे. एक लाख ५६ हजार ३८५ वर कोरोनामुळे मरण पावणाऱ्यांची संख्या गेली आहे. कोरोनावर मात करणाऱ्यांची टक्केवारी ९७.२२ पर्यंत गेली. म्हणजेच आतापर्यंत एक कोटी सहा लाख ९९ हजार ४१० जणांनी कोरोनावर मात केली आहे. जरी असे असले तरी नवी आकडेवारी भारतीयांच्या चिंतेत भर घालणारी आहे.

मागील पाच आठवड्यांमध्ये पहिल्यांदाच सात दिवसांचा विचार केल्यास देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत एक लाख रुग्णांची भर पडली आहे. भारतामध्ये फेब्रुवारी २१ रोजी संपलेल्या आठवड्यात कोरोनाचे एक लाख ९९० हजार रुग्ण आढळले. या पूर्वीच्या आठवड्यामध्ये नव्या रुग्णांची संख्या ७७ हजार २८४ एवढी होती. म्हणजेच गेल्या आठवड्यामध्ये देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत तब्बल ३१ टक्क्यांची वाढ झाली आहे.

महाराष्ट्र सर्वाधित रुग्णवाढ झालेल्या राज्यांमध्ये पहिल्या स्थानावर आहे. मागील २४ तासांमध्ये महाराष्ट्रामध्ये सहा हजार ९७१ रुग्ण आढळून आले असून कोरोनामुळे ३५ जणांचा मृत्यू झाला आहे. मागील १२१ दिवसांमधील हा सर्वाधिक आकडा आहे. रविवारी पुण्यामध्ये कोरोनाचे एक हजार १७६ नवे रुग्ण आढळून आले. तर सहा जणांनी कोरोनामुळे पुणे जिल्ह्यात रविवारी प्राण गमावला.

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्था बंद करण्याचे आदेश दिले आहेत. महाराष्ट्रातील रुग्णसंख्या मागील आठवड्यामध्ये ८१ टक्क्यांनी वाढली आहे. जो आठवडा २१ फेब्रुवारी रोजी संपला त्यामध्ये महाराष्ट्रात ३६ हजार ६०६ रुग्ण आढळून आल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सर्व सार्वजनिक, राजकीय आणि सामाजिक कार्यक्रमांवर बंदी घालण्याची घोषणा रविवारी केली. राज्यातील रुग्णसंख्या पुढील आठ दिवसांमध्ये कशी वाढते किंवा कमी होते त्यानुसार लॉकडाउनसंदर्भातील निर्णय़ घेतला जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. लॉकडाउन हा पर्याय नसला तरी कोरोनाची साखळी तोडण्यासाठी हा एकमेव मार्ग असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

कोरोना प्रादुर्भाव केरळमध्येही वाढल्याचे दिसून आले होते. पण आता तेथील परिस्थिती सुधारत आहे. केरळमध्ये मागील २४ तासांमध्ये चार हजार ७० कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आले आहेत. हा आकडा शनिवारच्या तुलनेत ५०० ने कमी आहे. आठवड्यांचा विचार केल्यास केरळमध्ये मागील आठवड्यात ३० हजार ८७१ कोरोनाबाधित आढळून आले. ही सप्टेंबरनंतरची सात दिवसात झालेली सर्वात कमी वाढ आहे.