पुद्दुचेरीत काँग्रेसला मोठा धक्का; कोसळले सरकार


पुद्दुचेरी – काँग्रेस पक्षाला पुद्दुचेरीत मोठा धक्का बसला असून तेथील सरकार कोसळले आहे. रविवारी काँग्रेसप्रणीत सत्तारुढ आघाडीतील आणखी दोन आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर पुद्दुचेरीतील व्ही नारायणसामी यांचे सरकार संकटात आल्यामुळे सरकारला सोमवारी बहुमत सिद्ध करावे लागले. सरकारला बहुमत सिद्ध करण्यात यावेळी अपयश आले. दरम्यान पुद्दुचेरीत जे काही सुरु आहे, तो राजकीय वेश्याव्यवसाय असल्याची टीका व्ही नारायणसामी यांनी केली आहे. विशेष म्हणजे नुकताच पुदुच्चेरीचा काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी दौरा केला होता. त्यांनी यावेळी एका कार्यक्रमाला उपस्थितीदेखील लावली होती.

काँग्रेस आणि द्रमुकच्या प्रत्येकी एक आमदाराच्या राजीनाम्यामुळे ३३ सदस्य असलेल्या विधानसभेत सत्तारुढ काँग्रेस आघाडीचे संख्याबळ ११ पर्यंत घसरले होते. १४ सदस्य विरोधी आघाडीकडे, तर सात जागा रिक्त असल्यामुळे नारायणसामी यांच्या सरकारवर बहुमत सिद्ध करण्याची वेळ आली होती. पण काँग्रेसचे सरकार विश्वासदर्शक ठरावात बहुमत सिद्द न करता आल्याने कोसळले आहे.

११ विरुद्ध ११ अशा मतांनी नारायणसामी सरकारचा पराभव झाला. एका दिवसाचे विशेष अधिवेशन बहुमत ठराव सादर करण्यासाठी बोलावण्यात आले होते. नारायणसामी यांनी अधिवेशन सुरु होताच बहुमतासाठी प्रस्ताव मांडला होता. पण काही वेळातच त्यांच्यासहित सत्ताधारी आमदारांनी सभात्याग केल्यानंतर अध्यक्षांनी काँग्रेस सरकार अल्पमतात असल्याचे जाहीर केले. दरम्यान यासंदर्भात पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, राज्यपालांची भेट घेऊन मुख्यमंत्री नारायणसामी यांनी राजीनामा सोपवला आहे.

राजीनामा देणाऱ्या आमदारांवर मुख्यमंत्री नारायणसामी यांनी टीका केली असून संधीसाधू म्हणून त्यांचा उल्लेख केला जाईल, असे म्हटले आहे. पक्षासोबत आमदारांनी निष्ठा राखली पाहिजे. राजीनामा देणारे आमदार आता लोकांना सामोरे जाऊ शकत नाहीत कारण त्यांना संधीसाधू अशी हाक मारली जाईल, अशी टीका नारायणसामी यांनी केली आहे.

जे काही पुद्दुचेरीत सुरु आहे, तो राजकीय वेश्याव्यवसाय आहे. पण विजय सत्याचाच होईल, असा विश्वास नारायणसामी यांनी बहुमत सिद्ध करण्याच्या आधी व्यक्त केला होता. भाजप जबरदस्ती हिंदी भाषा लादण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप नारायणसामी यांनी यावेळी केला आहे. आम्ही तामिळनाडू आणि पुद्दुचेरीत दोन भाषांचा वापर करतो, पण भाजप जबरदस्ती हिंदी लादत असल्याचे ते म्हणाले आहेत.