ठाकरे सरकारमधील नेत्यांना खरोखरच कोरोना झाला आहे का ? नितेश राणेंचा खोचक सवाल


सिंधुदुर्ग : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच अर्थसंकल्पीय अधिवेशन एक मार्चपासून सुरू होणार असतानाच राज्यात लॉकडाऊन आणि नाइट कर्फ्यू लावण्यात आला आहे. तसेच लॉकडाऊन मुंबईतही होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांना कोरोनाचा लागण झाल्याचे वृत्त आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. ठाकरे सरकारमधील नेत्यांना झालेला कोरोना खरा आहे की राजकीय, असा सवाल उपस्थित केला आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे गेल्या दीड वर्षात राज्याच्या कानाकोपऱ्यात फिरत होते. त्यांना आतापर्यंत कधीही कोरोना झाला नाही. त्यांना अधिवेशनाला आठ दिवस शिल्लक असतानाच कोरोना झाला. नेमका सकाळीच छगन भुजबळांनाही झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हेदेखील कुटुंबासोबत संवाद यात्रेसाठी राज्यभर फिरत आहेत. त्यांना आतापर्यंत कोरोना झाला नव्हता, तोही काही दिवसांपूर्वी झाला. म्हणून हा एक वेगळ्या प्रकारचा कोरोना महाराष्ट्रात आला नाही ना असा प्रश्न माझ्या मनात निर्माण झाला आहे, असा टोला नितेश राणे यांनी लगावला आहे.