उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथील शेतकरी आतापर्यंत कधीही न ऐकलेला एक प्रयोग करत आहेत. येथील बटाट्यांच्या काही उत्पादक शेतकऱ्यांनी पिकांना दारू पाजण्यास सुरूवात केली आहे. यामुळे पिकाचे उत्पादन वाढेल, अशी त्यांची अपेक्षा आहे.
शेतकऱ्यांचा अफलातून उपाय – बटाट्याच्या पिकांवर दारूची फवारणी
मात्र कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांनी त्यांचा हा दावा खोडून काढला असून दारूमुळे पिकांची उत्पादनक्षमता वाढण्याचा कोणताही पुरावा नाही, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
बुलंदशहरमधील काही शेतकरी बटाट्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी कीटकनाशकांऐवजी दारू टाकत आहेत. या शेतकऱ्यांची छायाचित्रे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पसरत आहेत, असे एएनआय वृत्तसंस्थेने म्हटले आहे.
“पिकांसाठी औषध म्हणून अल्कोहोलचा वापर करण्याला कोणताही शास्त्रीय आधार नाही. शेतकऱ्यांनी योग्य त्या औषधांचा वापर करावा, असे आवाहन मी करतो,” असे पीक उत्पादन अधिकाऱ्यांनी एएनआयला सांगितले.
शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, बटाट्याचे पीक थंडीच्या दिवसांत घेतले जाते. या पिकात देशी दारूची फवारणी केल्यामुळे पिकाचे उत्पादन तर वाढतेच, शिवाय बटाटा मोठा आणि टपोर सुद्धा होतो. यामुळे शेतकऱ्यांना अधिक फायदा होतो, असा दावा त्यांनी केला आहे.