शेतकरी आंदोलनामुळे ‘रिलायन्स जिओ’चे ग्राहक घटले


नवी दिल्ली – दिल्लीच्या सीमेवर कृषी कायदे रद्द करण्याची मागणी करत शेतकऱ्यांचे दोन ते अडीच महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. काही उद्योजकांसाठी हे कायदे सरकार करत असल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी आंदोलनादरम्यान केला होता. त्याचबरोबर शेतकऱ्यांनी रिलायन्सच्या वस्तू आणि सेवांवर बहिष्कार टाकण्याचं आवाहन केले होते. दरम्यान ‘ट्राय’च्या आकडेवारीतून त्याचा परिणाम ‘रिलायन्स जिओ’वर झाल्याचे समोर आले आहे. या आंदोलनामुळे रिलायन्स जिओचे ग्राहक मोठ्या संख्येने घटले आहेत.

शेतकरी आंदोलनाची झळ देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी असलेल्या रिलायन्स जिओलाही बसली आहे. कंपनीच्या आकडेवारीतून पंजाब व हरयाणातील ग्राहकांच्या संख्येत घट झाल्याचे स्पष्ट झाले आहे. डिसेंबर २०२० मधील अहवाल ट्रायकडून प्रसिद्ध करण्यात आला आहे. यात पंजाब व हरयाणात कंपनीच्या ग्राहक संख्येत घट झाल्याचे समोर आले आहे. दोन्ही राज्यात एका महिन्यातच ग्राहकाची संख्या कमी झाली आहे.

१८ महिन्यांच्या दीर्घ कालावधीनंतर पहिल्यांदाच कंपनीचे ग्राहक घटले आहेत. नोव्हेंबर २०२०मध्ये कंपनीच्या ग्राहकांची संख्या १.४० कोटी एवढी होती. डिसेंबरअखेरपर्यंत ती १.२५ कोटी एवढी कमी झाली आहे. कंपनीच्या ग्राहक संख्येत पंजाबमध्ये झालेली ही १८ महिन्यातील सर्वाधिक घट आहे.

जिओच्या वापरकर्त्यांची संख्या हरयाणामध्येही लक्षणीय घटली आहे. कंपनीच्या ग्राहकांची संख्या नोव्हेंबर २०२० मध्ये ९४.४८ लाख एवढी होती. डिसेंबरअखेर ती ८९.०७ लाख एवढी झाली आहे. २०१६मध्ये जिओ दूरसंचार सेवा सुरू केल्यानंतर हरयाणात कंपनीच्या ग्राहक संख्येत पहिल्यांदाच एवढी घट झाली आहे. डिसेंबरमध्ये रिलायन्सकडून यासंदर्भात निवेदन जारी करण्यात आले होते.

कंपनीने या निवेदनात ग्राहक सेवेत झालेल्या घटीबद्दलही स्पष्टीकरण दिले होते. कोरोनाच्या परिणामामुळे मागील तिमाहीत कंपनीच्या ग्राहक संख्येवर परिणाम झाल्याचे यात म्हटले होते. त्याचबरोबर निवडक भौगोलिक प्रदेशांमध्ये रिलायन्स समूहविरुद्ध कुहेतूने प्रेरित असलेली बदनामी करणारी मोहीम चालवली गेली, त्याचाही परिणाम झाल्याचे रिलायन्सने म्हटले आहे.