अजित पवारांनी काढून टाकली भाजपच्या दाव्यांतील हवा


पुणे: भाजपचे नेते ठाम शब्दांत राज्यातील ठाकरे सरकार फार काळ टिकणार नसल्याचे सांगत असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यात माध्यमांशी बोलताना पुन्हा एकदा यावर महत्त्वाचे वक्तव्य करत एकप्रकारे भाजपच्या दाव्यांतील हवा काढून टाकली आहे.

राज्यात सत्तांतराची चर्चा देशाचे गृहमंत्री व भापचे चाणक्य अशी ओळख असलेले अमित शहा यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यानंतर पुन्हा एकदा सुरू झाली आहे. शहा यांनी महाविकास आघाडी सरकारचा ‘तीन चाकी रिक्षा’ असा उल्लेख करत जोरदार निशाणा साधला होता. महाराष्ट्रात ऑपरेशन लोटसचे थेट संकेत त्यांनी दिले नसले तरी कार्यक्रमात त्यांच्या बाजूला बसलेले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे वारंवार तशी विधाने करून वातावरणनिर्मिती करत आहेत. ठाकरे सरकार राज्यातून पायउतार होणार आणि भाजप सरकार राज्यात येणार, असे या नेत्यांचे ठाम मत आहे. आज या अनुषंगाने अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्याला विशेष महत्त्व आहे.

अजित पवार यांना राज्य सरकारच्या स्थिरतेबाबत विचारले असता ‘सध्या तरी सरकारला कोणताही धोका नसल्याचे स्पष्ट शब्दांत सांगितले. त्यातून शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीत सध्या तरी सर्व काही आलबेल असल्याचेच सांगण्याचा अजित पवार यांनी प्रयत्न केला आहे.

लवकरच राज्यात मोठी पोलीस भरती होणार आहे, असे नमूद करताना पोलिसांच्या घरांचा प्रश्न मार्गी लावण्यात येईल, असे यावेळी अजित पवार यांनी सांगितले. पत्रकारांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाबाबत विचारले असता, त्यांनी सावध भूमिका घेतली. पोलिसांचा या प्रकरणात तपास सुरू असल्याचे म्हणत त्यांनी अधिक भाष्य टाळले. उद्योगपतींनी दिलेल्या गाड्या अधिकाऱ्यांनी घेणे योग्य नसल्याच्या एका प्रश्नाच्या उत्तरात अजितदादा म्हणाले. त्यांनी गुंड गजा मारणेची मिरवणूक आणि चोरट्यांचा पाहून पळालेले पोलीस या घटनांवरून पुणे शहर पोलिसांचे कान टोचले. गुन्हेगाराची मिरवणूक निघण्याच्या घटना घडतात त्याच्याकडे पोलिसांनी लक्ष द्यावे. प्रत्येक पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी गुन्हा, चोरी घडणार नाही याची खबरदारी घ्यायला हवी, असे अजित पवारांनी सांगितले.