उन्नाव पुन्हा हादरले; शेतात बेशुद्ध अवस्थेत आढळल्या दलित मुली, दोघींचा मृत्यू तर एकीची प्रकृती गंभीर


उन्नाव – उत्तर प्रदेशातील उन्नाव येथे दलित मुलींच्या मृत्यूमुळे खळबळ उडाली असून चारा गोळा करण्यासाठी घराबाहेर पडलेल्या तिन्ही मुली शेतात बेशुद्ध अवस्थेत सापडल्या होत्या. यामधील दोन मुलींचा मृत्यू झाला असून एका मुलीवर रुग्णालयात उपचार सुरु असून दरम्यान मुलींच्या कुटुंबियांनी मुलींवर विषप्रयोग करण्यात आल्याचा आरोप केला आहे.

याबाबत उन्नावचे पोलीस अधीक्षक आनंद कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयात दोन मुलींचा मृत्यू झाला असून जिल्हा रुग्णालयात एकीला दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक माहितीनुसार, मुली शेतात चारा आणण्यासाठी गेल्या होत्या. विषप्रयोग झाल्याची लक्षणे दिसत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

पोलिसांची सहा पथके तपासासाठी तयार करण्यात आली असून मुलींवर विषप्रयोग करण्यात आल्याचे प्राथमिकदृष्ट्या दिसत असून घटनास्थळी काही पुरावेदेखील सापडल्याचे आनंद कुलकर्णी यांनी सांगितले आहे. पोलीस सध्या शवविच्छेदन अहवालाची वाट पाहत आहेत. दरम्यान गावकरी आणि पीडित मुलींच्या कुटुंबीयांची पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे. परिसरात शेती असल्याने कुठेही सीसीटीव्ही लावण्यात आलेला नाही. दुसरीकडे दलित संघटना आणि भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी रुग्णालयात दाखल मुलीला चांगले उपचार मिळावेत यासाठी एम्समध्ये दाखल करावे, अशी मागणी केली आहे.