टूलकिट प्रकरणी उच्च न्यायालयाकडून निकिता जेकब यांना जामीन मंजूर


मुंबई – मुंबई उच्च न्यायालयाकडून पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गने शेतकरी आंदोलनासंदर्भात ट्विट केलेल्या टूलकिट प्रकरणातील संशयित अ‍ॅड निकिता जेकब यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दिल्ली न्यायालयाने टूलकिट प्रकरणात अजामीनपात्र वॉरंट बजावल्यानंतर तसेच अटकेसाठी मुंबईत दिल्ली पोलीस दाखल झाल्यानंतर जेकब यांनी अंतरिम जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तीन आठवड्यांसाठी निकिता यांना अंतरिम जामीन न्यायालयाने मंजूर केला आहे.

दिल्ली पोलिसांनी टूलकिट प्रकरणात बंगळुरूतील दिशा रवी या पर्यावरणवादी कार्यकर्तीला रविवारी अटक केल्यानंतर दिल्ली न्यायालयाने अ‍ॅड निकिता जेकब आणि बीड येथील शंतनू मुळूक यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट बजावल्यानंतर दिल्ली पोलीस अटकेचे प्रयत्न सुरू केले होते. अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आल्यानंतर निकिता जेकब आणि शंतनू मुळूक यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंठपीठात शंतनू यांनी याचिका दाखल केली होती. तर मुंबई उच्च न्यायालयात निकिता यांनी धाव घेतली होती. काल (१६ फेब्रुवारी) खंठपीठाने शंतनू यांना अंतरिम जामीन दिला होता. तर निकिता यांच्या अर्जावरील निर्णय राखून ठेवला होता. न्यायालयाने आज निकिता जेकब यांना तीन आठवड्यांसाठी जामीन मंजूर केला. त्याचबरोबर या दरम्यान त्यांना अटक झालीच, तर २५ हजारांच्या जातमुचलक्यावर सुटका करण्यात यावी, असेही न्यायालयाने म्हटले आहे. न्यायमूर्ती पी.डी. नाईक यांनी याचिकेवर निर्णय दिला.

थनबर्ग हिचे ‘टूलकिट’ या प्रकरणी अटकेत असलेली पर्यावरणवादी दिशा रवी आणि जेकबसह खलिस्तानी चळवळीत सहभागी असलेल्यांनी तयार केले व सोशल मीडियावरुन ते व्हायरल केल्याचा आरोप दिल्ली पोलिसांनी केला होता. प्रजासत्ताकदिनी लाल किल्ल्यावर घडलेला प्रकार हा एकप्रकारे हत्याकांडच होते. त्यात ४०० हून अधिक पोलीस जखमी झाले, असा आरोप करून दिल्ली पोलिसांनी जेकब यांची याचिका फेटाळण्याची मागणी काल झालेल्या सुनावणी दरम्यान केली होती.