काँग्रेस इंधन-गॅस दरवाढीविरोधात उतरणार रस्त्यावर – नाना पटोले


मुंबई – सर्वसामान्य जनतेचे जगणे केंद्रात मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून कठीण झाले असून अत्याचाराचा आलेख दिवसेंदिवस वाढत चालला आहे. पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात दररोज वाढ केली जात आहे. सध्या पेट्रोल प्रति लिटर ९६ रुपये तर डिझेल ८६ रुपये लिटर झाले आहे. त्यातच घरगुती वापराचा गॅस सिलेंडर ८०० रुपये झाला आहे. लाखो लोकांचे रोजगार कोराना संकटामुळे हिरावले गेले आहेत. नोकरदार, सर्वसामान्यांना जगणेही कठीण झाले आहे. त्यात मोदी सरकारने इंधन दरवाढ करून लूट चालवली आहे. इंधन दरवाढ मोदी सरकारने तात्काळ मागे घ्यावी अन्यथा काँग्रेस रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे.

नाना पटोले गांधी भवन येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना म्हणाले की, मोदी सरकार देशातील सर्वसामान्य लोकांचे सरकार नसून ते मुठभर लोकांच्या हितासाठी काम करणारे सरकार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती निचांकी पातळीवर आहेत. कच्च्या तेलाच्या आजच्या किंमती पाहता पेट्रोल ३५ रुपये तर डिझेल २५ रुपये लिटर असायला पाहिजे होते. पण पेट्रोलने अनेक ठिकाणी शंभरी गाठल्यामुळे महागाई वाढली आहे.

सामान्य लोकांचे जगणे कठीण झाले आहे. या दरवाढीसंदर्भात पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तर हात वर केले असून पेट्रोल डिझेलच्या किंमती आपल्या हातात नसल्याचे राज्यसभेत स्पष्ट केले आहे. सत्तेवर येताना भाजप सरकारने पेट्रोल डिझेलचे दर कमी करण्याचे आश्वासन दिले होते, त्यांनी त्या आश्वासनालाही हरताळ फासला आहे. लोकांचे खिसे कापण्यासाठी जनतेने भाजपला सत्ता दिली का? याचे उत्तर मोदी सरकारने जनतेला दिले पाहिजे.

लोकशाही मार्गाने चालणारे असे युपीएचे सरकार होते म्हणूनच ७० रुपये लिटर पेट्रोल झाले अभिनेते अमिताभ बच्चन, अक्षयकुमार आणि इतर सेलिब्रिटींनी त्यावेळी त्या इंधन दरवाढीविरोधात ट्विट करून संताप व्यक्त केला होता. अमिताभ बच्चन, अक्षयकुमार यासह एकाही सेलिब्रिटीने आता पेट्रोलने शंभरी गाठली असतानाही त्याविरोधात ट्विट का केले नाही, आता ते गप्प का आहेत? त्यांची मोदी सरकारच्या हुकूमशाही विरोधात बोलण्याची हिम्मत होत नाही का? असा सवाल नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे.

इंधन व गॅस दरवाढ तात्काळ कमी करून सामान्य जनतेला मोदी सरकारने दिलासा द्यावा अशी मागणीही नाना पटोले यांनी केली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत, अतुल लोंढे, देवानंद पवार व राजन भोसले हे या पत्रकार परिषदेला उपस्थित होते.