शाळा सुरू होताच १५ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण; सरकारी शाळा पुन्हा बंद!


नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावमुळे गेल्या वर्षी २३ मार्च रोजी लॉकडाऊन लागू केला होता. देशातील सर्वच भागातील शाळा तेव्हापासून बंद होत्या. त्यानंतर तब्बल ८ महिन्यांनी कोरोनावर प्रभावी ठरेल अशी सीरम इन्स्टिट्युटची व्हॅक्सिन बाजारात आली.

लॉकडाऊनकडून अनलॉकचा प्रवास देखील हळूहळू सुरू झाला. इतर सर्व आस्थापनांसोबतच कोरोना काळात बंद असलेल्या शाळा देखील टप्प्याटप्प्याने उघडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. टप्प्यांमध्ये देशाच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या शाळा सुरू होऊ लागल्या आहेत.

पण एकीकडे शाळा पूर्णपणे सुरू कराव्यात किंवा न कराव्यात, यावर महाराष्ट्रात मोठी चर्चा सुरू असताना दुसरीकडे पंजाबमध्ये कोरोना काळानंतर शाळा सुरू होताच १५ विद्यार्थ्यासोबत २ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे स्थानिक प्रशासनाला पुन्हा शाळा बंद करण्याचा निर्णय घावा लागला आहे.

७ जानेवारीपासून लुधियानाच्या चौंटा भागामध्ये शाळा सुरू करण्यात आल्या होत्या. या शाळा ५वी ते १२वी अशा ८ वर्गांसाठी सुरू झाल्या. पण शासकीय उच्च माध्यमिक शाळेत १६ फेब्रुवारी रोजी १५ विद्यार्थी आणि त्यांच्यासोबत २ शालेय कर्मचारी कोरोनाबाधित आढळले. ही शाळा २ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश लुधियानाच्या उपायुक्तांनी तातडीने दिले. तसेच, सर्व बाधित विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहे.

पंजाबमध्ये जवळपास १० महिने बंद राहिल्यानंतर ७ जानेवारीपासून शाळा सुरू झाल्या होत्या. तसेच, फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात पहिली आणि दुसरीचे वर्ग देखील सुरू करण्यात आले होते. गेल्या काही महिन्यांमध्ये पंजाबमधील कोरोनाबाधितांचा आलेख खाली आला असून सध्या पंजाबमध्ये २ हजार ३५७ कोरोनाबाधित उरले असल्यामुळेच शाळा देखील सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दरम्यान, शाळा सुरू झाल्यानंतर तिथे विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह सापडण्याच्या अनेक घटना देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये आढळून आल्यामुळे, एवढ्यात शाळा पुन्हा सुरू कराव्यात किंवा नाही? यावर चर्चा सुरू झाली आहे.