… तर काँग्रेसला लोकसभेच्या ४० जागाही टिकवता येणार नाही : चंद्रकांत पाटील


मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देशाच्या संरक्षण क्षेत्राला आत्मनिर्भर बनविण्याच्या प्रयत्नांना यश मिळत आहे. चेन्नईमध्ये स्वदेशी बनावटीचा हायटेक अर्जुन रणगाडा पंतप्रधान मोदी यांनी लष्कराला सुपूर्द केल्यामुळे देशाची संरक्षण व्यवस्था अधिक बळकट व सक्षम झाली आहे. देशाच्या संरक्षण मंत्रालयाबद्दल यामुळे सातत्याने अपप्रचार करणारे काँग्रेसचे नेते राहुल गांधी व काँग्रेसचा खोटारडेपणा आता उघड झाला आहे. भविष्यातही असाच खोटारडेपणा सुरु ठेवल्यास लोकसभेतील सध्याच्या ४० जागाही टिकविण्यासाठी काँग्रेसला कसरत करावी लागेल, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली.

संरक्षण संशोधन व विकास संस्थेच्या (DRDO) लढाऊ वाहने संशोधन व विकास आस्थापनेने अर्जुन एम के १ ए हा लढाऊ रणगाडा उत्पादित केला आहे. हंटर किलर रणगाडा असेही या लढाऊ रणगाड्याला म्हटले जाते, असेही ते यावेळी म्हणाले. देशाचा संरक्षण विभाग सक्षम असतानाही राहुल गांधी वारंवार संरक्षण विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत असून विनाकारण अपप्रचार करत आहेत. राहुल गांधी यांनी २०१८ मध्येही हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेडच्या (एचएएल) कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना मोदी यांच्या कार्यपद्धतीची चुकीची माहिती दिली व त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला होता. एचएएल सारख्या कंपन्यांची उत्पादन क्षमता पंतप्रधान मोदी कमी करत असल्याची चुकीची माहिती दिली होती. त्यांची ही वक्तव्ये म्हणजे देशाच्या संरक्षण खात्याला हेतुपुरस्सरपणे बदनाम करण्याचा प्रकार असून तो निंदनीय असल्याचेही पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

खोटारडेपणाच्या राजकारणामुळे कांग्रेसला ४०० जागांवरुन सध्या फक्त ४० जागा कशाबशा टिकविता आल्या. अशीच परिस्थिती भविष्यातही राहिली तर काँग्रेस पक्ष हा इतिहासात समाविष्ट होण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना या गोष्टींचे लवकरच आत्मचिंतन केल्यास ते त्यांच्यासाठी व काँग्रेससाठीही नक्कीच हिताचे असेल, असा टोलाही पाटील यांनी लगावला.

अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी २०१९ मध्ये लोकसभेत माहिती देताना स्पष्ट केले होते की, संरक्षण उत्पादनांच्या निर्मितीसाठी केंद्र सरकारने एचएएल या कंपनीसमवेत १ लाख कोटीचे कंत्राट केले आहे. तरीही यासंदर्भात राहुल गांधी व काँग्रसेने जनतेला खोटी माहिती देऊन देशाच्या संरक्षण विभागाची बदनामी केली होती. त्यानंतर या कंत्राटासंदर्भातील सर्व अधिकृत कागदपत्रे संरक्षण विभागानेही माध्यमांमार्फत सादर करुन राहुल गांधी यांच्या खोटारेडपणाचा पर्दाफाश केला होता. केवळ चीनच्या कथित मदतीने भारताला बदनाम करण्याचा प्रयत्न केल्यास एक दिवस जनताच तुमच्या खोटारेडपणाचा पर्दाफाश करेल व ही वेळ दूर नसल्याचा इशाराही पाटील यांनी यावेळी दिला.