कोरोनाबाधितांच्या वाढीव आकडेवारीवर मुख्यमंत्र्यांनी घेतले मोठे निर्णय


मुंबई: राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या काही दिवसांपासून वाढत चालला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी त्याच पार्श्वभूमीवर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेऊन काही सूचना केल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कोरोनाविषयी राज्यातील विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्यासमवेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली. त्यावेळी त्यांनी अनेक निर्णय घेतले आहेत.

त्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी घेतलेले निर्णय खालील प्रमाणे

  • लॉकडाऊन पाहिजे की काही थोड्या निर्बंधांसह मोकळेपणाने राहायचे हे जनतेने ठरवायचे आहे. मास्क लोक घालत नाहीत किंवा आरोग्याचे नियम पाळत नसतील तर हे नियम काटेकोरपणे अंमलात आणण्याची जबाबदारी जिल्हा आणि पोलीस प्रशासनावर आहे, अजिबात शिथिलता न दाखवता त्यांनी कडक दंडात्मक व आवश्यक कारवाई केलीच पाहिजे.
  • कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असेल त्या भागात किंवा परिसरात टार्गेटेड पद्धतीने तपासण्या करा, प्रत्येक रुग्णांच्या संपर्कात आलेले किमान 20 तरी शोधलेच पाहिजेत.सर्व काही व्यवहार सुरू झाले आहेत, निर्बंध शिथिल केले आहेत, त्यामुळे तरुण वर्ग घराबाहेर पडला आहे, त्यात जणू काही कोरोना संपला असे सगळे वागत आहेत, परिणामतः आपल्याच घरातील वृद्ध व ज्येष्ठ नागरिकांना आपण धोक्यात आणत आहोत. आपण मधल्या काळात माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम राबवून राज्याचा आरोग्य नकाशा तयार केला. यातील सह व्याधी रुग्णांची परत आरोग्य कर्मचाऱ्यांनी विचारपूस सुरू करा.
  • लॉकडाऊन उठविण्यासाठी आपणाकडे ज्या ज्या व्यावसायिक संस्था, संघटना येत होत्या, त्यासर्व संबंधित संस्था, संघटना यांच्याशी परत एकदा बोलून एसओपीची काटेकोर अंमलबजावणी होईल याची खात्री करून घ्या. जिथे कंटेनमेंट आवश्यक आहे, तिथे ते करा व त्याची अंमलबजावणी करा
  • आपण गेले वर्षभर कोरोनाशी लढतांना विविध क्षेत्रांसाठी नियम ( एसओपी) ठरविली आहे, पण त्याची अंमलबजावणी होताना सध्यातरी दिसत नाही, ही गंभीर बाब आहे. विशेषतः एवढे दिवस थांबलेले लग्न समारंभ सुरू झाले आहेत, लोकांच्या गाठीभेटी, पार्ट्या व इतर सामाजिक कार्यक्रम कुठल्याही आरोग्याच्या नियमविना होतांना दिसतात. उपाहारगृह, हॉटेल्सच्या वेळा आपण वाढविल्या आहेत, पण नियमांचे पालन होतांना दिसत नाही. स्थानिक प्रशासनाच्या पथकांनी अशा सर्व ठिकाणी भेटी देऊन तात्काळ कारवाई केली पाहिजे.
  • मास्क व इतर नियम पाळलेले ज्या विवाह किंवा इतर समारंभात दिसणार नाहीत, त्या हॉल्स किंवा सभागृहांचे परवाने रद्द करण्याची कडक कारवाई प्रसंगी केली पाहिजे. लोकांमध्ये बेफिकिरी आली असली, तरी स्थानिक प्रशासन व पोलिसांत कर्तव्यात ढिलाई नको.
  • हॉटेल्स, उपाहारगृहे यांना वेळा वाढवून दिल्या आहेत, पण कोणीही नियम पाळत नसतील तर लगेच कडक कारवाई करा. सार्वजनिक ठिकाणी पालिकांनी जंतुनाशक फवारणी नियमित करणे सुरू करावी. गावागावात जाऊन फिरत्या वाहनाद्वारे लोकांच्या चाचण्या वाढवा. ठिकठिकाणी उभारण्यात आलेल्या फिल्ड हॉस्पिटलमधील सर्व यंत्रणा व्यवस्थित सुरू आहेत का याची खात्री करा, ही सुविधा वापरण्याची वेळ येऊ नये, पण तयारीत राहा, अशाही सुचना मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत.