आमच्या नेत्याच्या वाटेला जाल तर याद राखा; राणे समर्थकांनी विनायक राऊतांना सुनावले


रत्नागिरी : राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांनंतर विशेषतः कोकणातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेले दिसत आहे. या दरम्यान शिवसेना आणि भाजप नेते एकमेकांवर वारंवार टीका आणि आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. भाजप खासदार नारायण राणे यांच्यावर शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केलेली टीका राणे समर्थकांना बरीच लागलेली दिसत आहे. कारण राणे समर्थकांनी आमच्या नेत्याच्या वाटेला जाल तर याद राखा, असा इशाराचा राऊतांना दिला आहे.

विनायक राऊत यांनी काही दिवसांपूर्वीच राणेंसारख्या नॉन मॅट्रिक माणसाला मंत्रिपद देण्याची वेळ आली, तर सिंधुदुर्गाचे दुर्दैव असेल. बुडत्याला काडीचा आधार, अशी टीका केली होती. राणे समर्थक यावरुन चांगलेच आक्रमक झाले असून, विनायक राऊत यांचा प्रतिकात्मक पुतळा त्यांनी जाळला. त्याचबरोबर आमच्या वाटेला जाल तर याद राखा, असा इशारा भाजप कार्यकर्त्यांनी यावेळी विनायक राऊत यांना दिला आहे.

भाजपकडून खोटारडेपणाचे राजकारण सुरु असून जी सत्ता केंद्रात आली आहे ती निष्ठूरपणे राबवायची हा त्यांचा एकमेव धंदा आहे. नारायण राणे आणि अमित शाह यांच्यासारख्या समविचारी लोकांची युती झाली असेल. ही युती लाईफटाईम टिको अशी अपेक्षा असल्याचेही विनायक राऊत म्हणाले होते. शिवसेनेने नारायण राणेंच्या हॉस्पिटलला विरोध केला नाही. याउलट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे फाईल आली, तेव्हा तातडीने मंजुरी देण्यात आली. राणेंच्या कंगालपणामुळे प्रस्ताव रखडला होता, असा दावा विनायक राऊत यांनी केला होता.

दरम्यान, राऊत यांना नारायण राणे यांचे सुपुत्र आणि माजी खासदार निलेश राणे यांनी प्रत्यूत्तर दिले. भाजपाच्या लाटेवर राऊत दोनवेळा निवडून आले. हिम्मत असेल तर राजीनामा द्या आणि निवडून येऊन दाखवा. हे स्वत: नॉन मॅट्रिक आहेत. लोकसभेत बोलायला उभे राहिले की, काय बोलतात तेच समजत नाही. मातोश्रीवरचा चप्पलचोर, बाळासाहेब असताना थापा होता, तो गेला असेल, आता नवीन थापा झाला असल्याचा जोरदार पलटवार निलेश राणे यांनी केला.