मुंबईतील चेंबूरमध्ये पुन्हा एकदा लॉकडाउन?


मुंबई – राज्यात कोरोना संकट पुन्हा एकदा वाढत असून कालच राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार यांनी काही कठोर निर्णय घ्यावे लागतील असे म्हणत सूचक इशारा दिला होता. तर दुसरीकडे कोरोनाबाधितांची संख्या आर्थिक राजधानी मुंबईत वाढू लागल्याने आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. सोमवारी मुंबईत ४९३ नवीन रुग्णांची नोंद झाली तर ३ रुग्णांचा मृत्यू झाला. कोरोनाबाधित रुग्ण आढळण्याचे प्रमाण ५ टक्के झाले आहे. त्यातच आता पुन्हा एकदा लॉकडाउनचं संकट घोंघावू लागले आहे.

त्यातच सर्वाधिक रुग्ण आढळलेल्या चेंबूरमधील एम-पश्चिम वॉर्डकडून सोसायटी आणि फेरीवाल्यांना कोरोना चाचणी करण्यात सांगण्यात आले आहे. येथील उंच इमारतींमधील सर्वाधिक रुग्ण आहेत. त्याचबरोबर पालिका अधिकाऱ्यांनी कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रित करण्यासाठी लॉकडाउन लागू केला जाण्याची शक्यता व्यक्त केली आहे. यासंदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाइम्सने दिले आहे.

या वॉर्डमध्ये एका आठवड्यापूर्वी दिवसाला १५ पेक्षा कमी रुग्ण आढळत होते. पण हेच प्रमाण आता २५ वर गेले आहे. रुग्णवाढीचा दर दिवसगणिक ०.२८ टक्क्यांवर पोहोचला असून पालिका अधिकारी यासाठी नागरिकांकडून सर्रासपणे होणारे नियमांचे उल्लंघन यासाठी जबाबदार असल्याचे सांगत आहेत. महानगर पालिकेने परिस्थितीची दखल घेऊन निवासी सदनिकांना नोटीस पाठवली असून कोरोनासंबंधित नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची सूचना केली आहे. त्याचबरोबर या नोटीसमध्ये महापालिका कोरोनासंबंधी जास्त प्रकरणे आढळणाऱ्या इमारती आणि सोसायटींना सील करत असल्याची माहिती देण्यात आली आहे.

महानगरपालिकेने पाठवलेल्या नोटीसीमध्ये सोसायटींना या नियमांचे पालन करण्यास सांगण्यात आले आहे –

  • इमारतीत घरकाम करणाऱे, दूधवाला यांच्यासहित बाहेरील कोणत्याही व्यक्तीला परवानगी देऊन नका.
  • थर्मल स्क्रिनिंगसारख्या गोष्टींचे काटेकोरपणे पालन करावे.
  • जर कोरोनाबाधित आढळला तर कुटुंबाने १४ दिवस अलगीकरणात राहणे अनिवार्य
  • हाय-रिस्क असणाऱ्या कुटुंबातील इतर सदस्यांची कोरोना चाचणी करणे अनिवार्य
  • सोसायटीमध्ये लक्षणे असणाऱ्यांचीही चाचणी बंधनकारक