ठाकरे सरकारकडून जळगाव अपघातातील 15 मृत मजुरांच्या नातेवाईकांना दोन लाखांची मदत


मुंबई: जळगाव जिल्ह्यातील किनगाव (ता. यावल) येथे पपई घेऊन जाणाऱा टेम्पो पलटी होऊन झालेल्या अपघातात 15 मजूरांचा दुर्दैवी अंत झाला. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून या मजुरांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख रुपये देण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले.

रावेर तालुक्यातील मृत मजूर हे रहिवाशी असल्याची माहिती प्रथमदर्शनी मिळत आहे. मृतांमध्ये सहा महिला व नऊ पुरूषांचा समावेश आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा अपघात दुर्देवी असल्याचे सांगताना मृत मजुरांच्या कुटुंबियाप्रती आपली सहवेदना व्यक्त केली आहे. याशिवाय अपघातात गंभीर आणि किरकोळ जखमी झालेल्या मजुरांवर शासकीय खर्चाने उपचार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

मुख्यमंत्र्यांना अपघाताची माहिती मिळताच त्यांनी जळगाव जिल्हा प्रशासनाकडून घटनेची माहिती घेतली. तसेच संबंधित अपघातग्रस्तांना सर्व ती आवश्यक मदत करण्याचे निर्देश दिले. दरम्यान, पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनीही आभोडा गावाला सांत्वनपर भेट दिली. याठिकाणी त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.

जळगावात ट्रक उलटून झालेल्या अपघातात 15 मजुरांचा मृत्यू झाला, तर पाच जण जखमी झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदीही या घटनेने हेलावले आहेत. पंतप्रधानांनी मराठीतून ट्विट करत शोक व्यक्त केला आहे. महाराष्ट्रातील जळगाव येथे हृदय हेलावून टाकणारा ट्रकचा अपघात घडला आहे. शोकाकुल कुटुंबांच्या दुःखात मी सहभागी आहे. जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होवो, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले.