जयंतरावांच्या बॉसमध्ये इतर मतदार संघात उभे राहण्याची हिंमतही नाही ; राम कदम


मुंबई – भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात सुरु असलेली शाब्दिक चकमक वाढत चालली असून माझ्याशिवाय शरद पवारांना करमत नाही, मी काहीच बोललो नाही तरीही माझ्यावर बोलतात असा चिमटा शरद पवारांना चंद्रकांत पाटलांनी चंद्रकांत पाटलांनी काढला होता. त्यावरून राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आता चंद्रकांतदादांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. पुण्यातील एका अतिशय चांगले काम करणाऱ्या महिलेने तयार केलेला मतदारसंघ चंद्रकांत पाटील ताब्यात घेतला आणि तिथून निवडणूक लढवली हा पुरुषार्थ आहे का? असा सवालही त्यांनी केला होता. यावरून भाजपा नेते राम कदम यांनी आता जयंत पाटील याच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.


चंद्रकांत पाटील यांनी मारलेला बाण अचूक वर्मी बसलेला दिसतोय. म्हणूनच राष्ट्रवादीच्या प्रांताध्यक्षांनी इतकी उद्विग्न प्रतिक्रिया दिली. जयंत पाटील जे बोलले त्यातून एकच सिद्ध होते की चंद्रकांत पाटील महाराष्ट्रातून कुठूनही निवडून येऊ शकतात. मात्र, जयंतरावांच्या बॉसना हे अजूनही जमत नसल्याची बोचरी टीका राम कदम यांनी केली.

व्यक्तीगत टीका आम्ही कधीही करत नाही. परंतु जयंत पाटील यांनी आपल्याच वक्तव्यावरून महाराष्ट्राला सांगितले की महाराष्ट्रातील कोणत्याही मतदारसंघातून चंद्रकांत पाटील निवडून येतात. त्यांच्या पक्षाचे सर्वेसर्वा इतर मतदार संघात उभे राहण्याची हिंमतदेखील करत नाही. चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य त्यांच्या वर्मी लागलेला दिसत आहे. यापूर्वीही जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटलांचे वय काढले, पण वय काही असले तर स्वत:च्या जीवाची पर्वा न करता ते गावोगावी कोरोना काळात फिरत होते. तुमचे सर्व मंत्री आणि सरकार एअर कंडिशन असलेल्या बंगल्यात स्वत:च्या जीवाची चिंता करत होते, हे अजूनही महाराष्ट्र विसरला नसल्याचेही ते म्हणाले.