रिंकू शर्माच्या हत्येला जबाबदार असणाऱ्या अमित शहांनी राजीनामा द्यावा


नवी दिल्ली – काही दिवसांपूर्वी दिल्लीमध्ये रिंकू शर्मा या तरूणाची हत्या करण्यात आल्याची घटना घडली होती. दिल्लीतील राजकीय वातावरण भाजपा युवा मोर्चा आणि विश्व हिंदू परिषदेचा कार्यकर्ता असलेल्या रिंकूच्या हत्येवरून गरम झाले आहे. त्यातच आता दिल्लीत खून होणे सर्वसामान्य गोष्ट झाली असून, रिंकू शर्माच्या हत्येला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जबाबदार असल्याचा गंभीर आरोप आम आदमी पक्षाने केला आहे. आपने या प्रकरणात अमित शहा यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली आहे.

व्यावसायिक वादातून रिंकू शर्मा यांची हत्या करण्यात आल्याचे दिल्ली पोलिसांनी म्हटले आहे. तर दुसरीकडे राम मंदिराच्या उभारणीसाठी निधी संकलन करण्यावरून त्याची हत्या करण्यात आल्याचा दावा विश्व हिंदू परिषदेने केला आहे. रिंकू शर्माच्या हत्येवरून दिल्लीत राजकीय आरोप प्रत्यारोप शिगेला पोहोचले आहेत. त्यातच आपने या हत्येसाठी आता अमित शहा यांना जबाबदार धरले आहे.

खूनाच्या घटना दिल्लीत होणे ही आता सर्वसामान्य बाब झाली आहे. केंद्रीय गृहमंत्री या हत्यांसाठी जबाबदार आहेत. भाजपा सरकारच्या काळातच हिंदू सुरक्षित नाहीत. दिल्लीतील कायदा सुव्यवस्था खराब झाली आहे. अनेक घटनांतून हेच समोर आलं आहे की, दिल्लीतील कायदा व सुव्यवस्था राखण्यात केंद्रीय गृहमंत्रालय सपशेल अपयशी ठरलं आहे. आम्ही या हत्येचा तीव्र निषेध करतो आणि गृहमंत्रालयाला विनंती करतो की कायदा व सव्यवस्थेवरून लोकांचा विश्वास पुन्हा कायम होण्यासाठी तातडीनं पावलं उचलावीत,” आपचे प्रवक्ते सौरभ भारद्वाज यांनी म्हटले आहे.

काही धार्मिक मुद्द्यावरून काही दिवसांपूर्वी रिंकू आणि शेजारी राहणाऱ्या नसरुद्दीन यांच्यात वाद झाला होता. रिंकूच्या घरात बुधवारी रात्री नसरुद्दीन आणि इतर तिघे जबरदस्ती घुसले आणि त्याच्या पाठीवर चाकूने वार केले. आतापर्यंत तपासात मिळालेल्या माहितीनुसार, वाढदिवसाच्या पार्टीदरम्यान रेस्तराँ बंद करण्यावरुन हा वाद झाला होता. सर्वजण एकमेकांना ओळखत होते आणि एकाच परिसरात राहत होते. हत्येमागे इतर कोणतं कारण असल्याचा दावा चुकीचा असल्याचे पोलिसांनी या प्रकरणावर सांगितले होते. या प्रकरणी पोलिसांनी पाचही आरोपींना अटक केली असून, प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले आहे.